"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, October 17, 2014

खरं सांगायचं तर...

खरं सांगायचं तर राज्यशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा विषय आणि राजकारण हा माझ्या रुचीचा विषय राहिला असला तरी प्रत्यक्ष राजकारण, प्रचार, पक्षकार्य यात मी कधीच सहभागी झालेलो नाही किंबहुना कटाक्षाने स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवत आलेलो आहे.

भाग्य चांगले असल्याने लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक झालो. संघकार्यात टिकून राहात कार्यकर्ता झालो. राजकारणात भाग घ्यावा अशी ना कधी इच्छा झाली ना कधी सूचना केली गेली. समाजाच्या संघटनाचे काम करत असताना सारेच आपले आहेत हा विचार मनात घेऊनच काम करायला शिकलो. संघाचे काम हे ‘सर्वेषां अविरोधेन’ आहे हा पूजनीय श्रीगुरुजींचा दिशादर्शक विचार. आणि समाजाची जी विविध अंगे आहेत उदा शिक्षण, आरोग्य, क्रीडा, वैद्यकीय, भाषा, संस्कृती, व्यापार, धर्म इ. त्यातलेच एक राजकारण आहे. राजकारण आपल्याला अस्पृश्य नाही. अन्य क्षेत्रांप्रमाणे त्याचाही विचार व्हावा. प्रचलित राजकारणाच्या शुद्धीकरणाचा विचार आपणही करावा. पण पक्षीय राजकारणापासून कटाक्षाने अलिप्त राहावे. कारण राजकारणात आज मित्र, उद्या शत्रू, पुन्हा परवा मित्र असे बेभरवशाचे सारे असल्याने आपल्याला ते जमणारे नाही. शिवाय ‘वारांगना एव नृपनीती’ असल्याने आपण त्यात पडू नये. राजकारणात एकाची बाजू घेतल्यावर स्वाभाविकच बाकी सारे विरोधक होतात, आपली इच्छा असो वा नसो! त्यामुळे ज्याला समाज संघटनाचे काम करायचे आहे त्याने राजकारणात न पडलेलेच बरे.

पण तरीही या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बऱ्यापैकी सक्रिय राहिलो. लोकसभेच्या वेळी केवळ अधिकाधिक लोकांनी मतदान करावे असा आग्रह धरला होता. किंबहुना शत-प्रतिशत मतदान हे परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आवाहन केले होते त्यामुळे सर्व स्वयंसेवक वर्ग त्यात उतरला. अखिल भारतभर सगळीकडे लोकांना आग्रह, विनंती, जागृती या माध्यमातून मतदानाचे आवाहन केले आणि भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली.

खरं सांगायचं तर विधानसभेच्या वेळीही केवळ मतदानाचाच आग्रह धरणार होतो. पण युती तुटली आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा काढला गेला, मराठी-गुजराती वाद अगदी जाणीवपूर्वक निर्माण केला गेला, लोकांच्या मनात विविध भयगंड रुजवले गेले, स्वतःच्या वर्तमानपत्रातून निर्बुद्धासारखी विखारी टीका केली गेली, शिवाजी महाराजांना प्रांतीयतेच्या सीमांनी बांधण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला गेला, हिंदुत्वाची टिमकी वाजवणारे मराठी-गुजराती असा वाद निर्माण करताना कचरले नाहीत, नरेंद्र मोदींवर – देशाचे पंतप्रधान असून – निम्नपातळीवर जाऊन टीका-टिप्पणी करण्यात आली. हे सर्व एवढे वाढले की संघाचे नव्याने स्वयंसेवक झालेले काहीजण आपसात मराठी-गुजराती करून एकमेकाची महाराष्ट्रनिष्ठा विचारायला लागले..आणि या सर्वांमुळे समाजाचा एक घटक म्हणून मला त्यात पडावे लागले.

माझ्या अंगाला वाळू लावून नाचण्याचा सेतू बंधनाला कितपत फायदा होईल हा भाग अलाहिदा परंतु मला खोटे बघवले नाही. निरर्गल आरोप, वाईट शब्दात खिल्ली उडविणे, लहान तोंडी मोठा घास घेणे याचा विरोध करण्याची अंतःऊर्मी मला स्वस्थ बसू देईना. फोटोशॉपिंगच्या माध्यमातून खालच्या पातळीवर जाऊन बनवलेली चित्रे मला प्रचारात खेचून गेली. दुसऱ्याचे आई-बाप काढायचे आणि स्वतःचे काढल्यावर त्याला मारायचे, काळे फासायचे, तोडफोड करायची हे तर जणू त्यांचे व्यवच्छेदक लक्षण. महाराष्ट्राच्या राजकारणाचे मवालीगिरीत कोणी रुपांतर केले हे महराष्ट्राच्या जनतेला वेगळे सांगायला नको. विचारांची मुक्तता नाही, मोकळेपणाने विरोधी विचार स्वीकारणे नाही, ‘हटाओ लुंगी बजाओ पुंगी’ यांसारखी देशविघातक आरडाओरड करायची, मराठी तरुणांची स्वप्ने दाबून ठेऊन छोट्या महत्त्वाकांक्षेत त्यांना जखडून ठेवायचं आणि स्थानिक पातळीवर दादागिरी करत राहायची, स्वतः निवडणूक कधी लढवायची नाही या सर्वांमुळे मला पहिल्यापासूनच युती पचली नव्हती. पण युती झाली तेव्हा मी केवळ ३ वर्षांचा होतो.
पुढे मोठं झाल्यानंतर मनात हे शल्य डाचत असे की आपल्या पसंतीच्या पक्षाला का मतदान करता येऊ नये? बरं ध्येयधोरणे वेगवेगळी, कार्यक्रम वेगवेगळे, कार्यपद्धती वेगवेगळी, टीका सदोदित..एवढे असूनही का मतदान करायचे? ती मानसिक घुसमट थांबली..

भाजप ने अन्य पक्षातील लोकांना घेऊन लगेच तिकिटे दिली याला मी राजकीय डावपेच म्हणून शकत नाही. त्याला मी दूरदृष्टीहि म्हणू शकत नाही. काही म्हणायचेच असेल तर भाजप ज्या कर्मनिष्ठांचा वैचारिक वारसा सांगतो त्या नीतिवान नेत्यांचा तो घोर पराभव होता. सत्तालालसेपायी त्या विचारनिष्ठ धुरिणांना न पटणारी ती तडजोड होती. मला अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती आणि आहे. पण तरीही भाजपने पूर्वाश्रमीच्या मित्रपक्षावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. शिवरायांचे राजकारण केले नाही, हिंदुत्वाला आपली खाजगी प्रॉपर्टी कधी बनवले नाही. कोण कोणाचे किती फोटो छापतो यावरून त्याची निष्ठा मोजली नाही. आणि याचाच मला त्रास झाला.

ही हिंदू मानसिकता आहे. दुर्बलाच्या बाजूने उभे राहणे ही स्वाभाविक भावना आहे. मी नाटकी बोलत नाही परंतु भाजपने जर अशाप्रकारे कुणाच्या शिवनिष्ठेवर प्रश्न उठवले असते, कुणाचे फोटो छापले आहेत-नाहीत यावरून अश्या कोत्या प्रकारचे राजकारण केले असते, मराठी-गुजराती अशाप्रकारची समाजात फूट पाडण्याचे, तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले असते तर मी त्याविरोधात उभा राहिलो असतो. परत तेच, माझ्या अशा विरोधाचा कुणाला किती फायदा-तोटा झाला असता हा मुद्दा माझ्या लेखी संभवतच नाही. जे होईल ते होईल पण माझ्या मनाला जे पटत नाही त्याचा विरोध मी करणारच.

शिवाय ज्या प्रकारे कुजबूज आघाडी भाजप च्या पूर्वमित्रांनी उघडली आणि त्याला विरोध केला असता धमकावण्याचे प्रयत्न केले त्यावरून मी सुद्धा फेसबुक, whatsapp अशा माझ्या हाताशी असणाऱ्या साधनांद्वारे आघाडी उघडली. त्यावरसुद्धा काहीजणांनी मग भाजपविरोधी पोस्ट्स टाकायला सुरुवात केल्यावर मी त्या सरळ उडवायला लागलो. कारण स्वतः हवे तसे खालच्या पातळीवर जाऊन campaign करायचे आणि दुसरा कोणी बोलला की त्याला धमकावत राहायचे, प्रश्न करत राहायचे हे मला मान्य नव्हते आणि नाही. म्हणून माझ्या पोस्ट्सवर मला न पटणारी कॉमेंट आली की मी ती पुसून टाकायला सुरुवात केली. हे वादविवादाच्या सर्वसंमत तत्वांना धरून नाही याची मला पूर्ण जाणीव असूनही मी तसे केले कारण लढाईत समोरचा कसेही वार करत असेल तर केवळ ढाल धरून बसणे मला मान्य नाही.


या माझ्या नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकाराने मित्र चिडल्यासारखे झाले, followers (फेसबुकवर रूढार्थाने followers) unfollow व्हायला लागले आणि ते स्वाभाविकही होते. पण मी त्याची परवा केली नाही. आज निवडणूक संपल्यावर त्या सर्वांना सॉरी म्हणणे माझे कर्तव्य आहे. निवडणुका येतील जातील, सरकारे स्थापन होतील, युत्या-आघाड्या तुटतील-जुळतील पण आपल्यात मनभेद नकोत. झाले गेले विसरून जाऊ. मुद्दाम हे सर्व निकाल लागण्याआधीच स्पष्ट केले कारण निकालानंतर काय चित्र असेल माहिती नाही. तेव्हा या लेखाचा कदाचित वेगळा अर्थ लावला जाऊ शकला असता म्हणून निकालाआधीच हे सर्व लिहून मन मोकळे केले...

Tuesday, May 20, 2014

काका ...

काका! हो. काकाच नाव पुरेसं आहे त्यांच्यासाठी. आम्हा सर्वांचेच काका होते ते! त्यांचं नाव-आडनाव जाणून घेण्याची गरज नाही भासली कधी.

ठेंगणा बांधा, लहानपणी आट्यापाट्या, खो-खो खेळल्याने चपळ शरीर, पांढरे केस, कपाळाला काळा बुक्का, साधासा चष्मा, पंधरा सादर लेंगा, क्वचित शर्ट, खांद्याला झोळी, प्रेमळ डोळे आणि चेहऱ्यावर नेहमी हसू. प्रसन्न व्यक्तिमत्व!

काका एकटेच राहायचे. बाबामहाराज आर्वीकर हे त्याचं सर्वस्व होतं. त्यांच्यावरच्या भक्तीपोटी काका अविवाहित राहिले आणि भक्तिमार्गात रमले. बाबामहाराज जाऊन कितीतरी वर्ष झाली पण जगाला प्रेम अर्पण करण्याचा त्यांचा संदेश काकांनी तंतोतंत पाळला.

काका स्वतःचं जेवण स्वतः करत, कपडे स्वतः धूत आणि सर्व कामं आनंदाने करत. आम्ही कधी थकूनभागून काकांकडे गेलो की पाणी आणि एखादा लाडू, केळं हे तर हमखास मिळेच पण त्याबरोबर एखादी गरमागरम चपाती किंवा तूप-मीठ-भात खाऊन जाण्याचा आग्रह असे. त्यांचं जेवण नेहमीच चविष्ट असे कारण त्यात ते अम्च्यावरची माया ओतत असत आणि आपुलकीने वाढत असत. बिटाची कोशिंबीर, गरमागरम डाळीची आमटी अहाहा!

कधीकधी काका खुंटीवरची एकतारी काढून तल्लीन होऊन भजनं म्हणत असत. ती श्रीकृष्णाची मूर्तीच त्यांची माता-पिता-बंधू होती. आम्हीही रममाण होऊन जात असू. हिंदी-मराठी भजनं, त्यांच्या चाली श्रवणीय असत.

काका साधे होते. त्यांना जगाचे छक्के-पंजे कळले नाहीत. स्वार्थ साधणे जमले नाही आणि कुणाचे दडपण झुगारणे शक्य झाले नाही. सतत एखाद्या दडपणाखाली, कुणाच्यातरी ताणाखाली आपले जीवन व्यतीत करत असतानाही हसतमुख राहून सर्वांची प्रेमळपणाने सेवा करत राहणे हे काकांकडून शिकण्यासारखे!

आमच्या वाढदिवसाला त्यांचा आठवणीने फोन ठरलेला असे. “हां...काका बोलतोय...काय प्लान आज?...येऊन जा नक्की!”

आज काका आपल्यात नाहीत. त्यांना स्वर्गवासी होऊनही बरीच वर्षे झाली; पण त्यांच्या  वाढदिवशी आम्हाला प्रकर्षाने त्यांची आठवणं झाल्याशिवाय राहत नाही. वाटतं जावं त्यांच्या घरी. तिथे बेल वाजवल्यावर हसतमुखाने दार उघडतील आणि मोठ्ठ्याने म्हणतील, “या ss !”

काका खूप सश्रद्ध मानाने आणि तल्लीनतेने बाबामहाराजांच्या गोष्टी, प्रसंग, आठवणी, अनुभव आम्हाला सांगत असत. संतमंडळींचे भक्त म्हणजे लेकरं असतात हे आम्हाला जाणवलं. सोलापूर जवळच्या ‘माचणूर’ या गावाचं नाव ‘माचणूर’ कसं पडलं ती गोष्ट काका खूप रंगवून सांगत असत. मला त्यातली नावं आठवणार नाहीत पण एक मुघल सरदार रयतेवर अत्याचार करत आला आणि गावच्या शिवमंदिरावर लोकांची खूप श्रद्धा असल्याने तिथे तो नाश करायला पोहोचला. त्याने गोमांस आणलं होतं एका ताटात भरून; जे तो घेऊन गाभाऱ्यापर्यंत गेला खरा; पण तातावारचे वेष्टन/कापड दूर करताच चमत्कार नजरेस पडला. मांसाच्या तुकड्यांच्या जागी गुलाबपुष्पांच्या पाकळ्या होत्या. अशाप्रकारे ‘मांसाचा नूरच’ बदलला म्हणून तेव्हापासून ‘मांसनूर’ चे मग ‘माचणूर’ झाले. अशा कित्येक गोष्टींचा खजिना काकांकडे होता.

कालाष्टमी, रामजन्म अशा गोष्टी काका खूप उत्साहाने साजऱ्या करत असत. त्यामध्ये खूपजण सहभागी होत असत. काकांचे स्वयंपाकघर भक्तमंडळींच्या कुटुंबांनी भरून जात असे. ४०-४५ पाने उठत असत. मग दुसऱ्या दिवसापासून काका एकटेपणाचा उत्सव साजरा करत असत.

काकांना वर तोंड करून कुणाला बोलणे कधीच जमले नाही. पटलं नाही तरी चार खडे बोल सुनावता आले नाहीत. काकांनी निमूटपणे, सोशिकतेने सर्व सहन केलं. कदाचित त्यांच्यासमोर पर्यायही नसावा. अगतिक असावेत. पण आम्हाला हे शेवटीशेवटी कळलं. वेळप्रसंगी आपल्या घरी वयोवृद्ध, आजारी व्यक्तिंची त्यांनी केलेली शुश्रुषाही आम्ही पाहिली.


आज आम्ही त्यांना ओळखणारी मित्रमंडळी एकत्र जमतो तेव्हा हमखास त्यांच्या आठवणी निघतात. “जीवनात चांगले काम करावे” तर लोक तुमची चांगली आठवण काढतील हे काकांकडून शिकावे. देवाने त्यांना तसं अकालीच बोलावून घेतलं. खूप साधे, निर्मळ, आनंदी, उत्साही आणि प्रेमळ असणारे काका आज हवे होते; म्हणजे हक्काने सांगता आलं असतं, “काका आम्ही येतोय..काहीतरी फक्कड बेत करा!”

Wednesday, February 19, 2014

रामू आणि झाकिर

गावात एकच शाळा होती. अन् तिथले गुरुजी सर्व वर्ग घ्यायचे. गाव छोटं असल्याने सर्वजण एकमेकाला ओळखत असत. गावातल्या देवपंचायतनाच्या जवळ रामू राहत असे. तिथून डाव्या अंगानं थोडं पुढे गेलं की चढावावर रामूच्या खास मित्राचं म्हणजेच झाकिरचे घर येत असे. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री होती. शाळेत जाताना एकत्र, नदीवर पोहायला जाताना एकत्र, जत्रेला सोबत. मैत्रीची घट्ट वीण जपत दोघंही मजेत जगत होते.

रामूचे वडील ग्रामपंचायत कार्यालयात कारकून होते तर झाकिरचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत कारकून होते. दोघांचीही मैत्री होती. साधारण आर्थिक दर्जा तोच होता. दिवाळीला झाकिर, त्याचा मोठा भाऊ हनिफ आणि धाकटी बहीण रझिया हे रामूच्या घरी कंदील बनवायला जमत असत आणि रामू ईदच्या दिवशी झाकिर बरोबर शीरकुर्म्याचा आस्वाद घेत धूप जाळत असे. मग मजमुआचे अत्तर लावून ऐटीत घरी येणे हा रामूचा ठरलेला क्रम होता.

रामू आणि झाकिर तसे अभ्यासातही सारखेच गुण मिळवत असत. रामूचं गणित चांगलं होतं आणि झाकिर चा भूगोल. दोघांनी एकमेकाला अडलेल्या गोष्टी शिकवायच्या असा जणू अलिखित करारच झाला होता दोघांमध्ये. शाळेत जाताना शिवमंदिरात घंटा वाजवून रामू बाहेर येत असे तर मशिदीच्या धूपाचा अंगारा लावल्याशिवाय झाकिर पुढे जात नसे. त्यांच्या मैत्रीच्या आड या गोष्टी कधीच आल्या नाहीत. रामूचे मंदिरात श्रद्धेने जाणे आणि त्याच, तितक्याच, तशाच श्रद्धेने झाकिरचे मशिदीत जाणे एवढाच काय तो फरक दोघांमध्ये होता. बाकी सर्व सारखे.. घरची आर्थिक परिस्थिती, आई-वडिलांचे शिक्षण, त्यांचे कामाचे तास, पगार, कष्ट, नैसर्गिक अडीअडचणी हे सर्व सारखे. हाकेच्या अंतरावर तर घरे होती दोघांची. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी फुटकी कौले बदलण्याचा कार्यक्रम ठरलेला. एकूण कौलं झाकिरचे बाबा घेऊन येणार आणि मग दोन्ही घरांवर ती कौलं चढणार. तर उन्हाळ्यात लागणारी झापं रामूचे बाबा घेऊन येणार आणि मग दोन्ही अंगणात मस्त सावलीची सोय होणार..

एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे रामू आणि झाकिर मोठे होत होते. एक दिवस वर्गात शिक्षक आले आणि फी गोळा करताना म्हणाले झाकिर, “आजपासून तुझी फी माफ!” रामूला आणि झाकिर ला दोघांनाही प्रश्न पडला की नेहेमीप्रमाणे रामूची फी तर जमा करून घेतली; मग झाकिर ची फी का माफ केली? त्यांनी जास्त विचार केला नाही. शाळा सुटली. झाकिरने फी च्या पैशातील थोडे पैसे खर्च करून चिक्की घेतली आणि दोघंही चिक्की खात खात घरी परतले. 

पुन्हा काही महिन्यांनी अशाच एका दिवशी शिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी झाकिर ला उभे राहायला सांगितले. त्याला फी तर माफ होतीच पण शिवाय आता शिष्यवृत्ती मिळणार होती. शिक्षकांनी त्याला सांगितले की, “आता तुला दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे तेव्हा हा अर्ज घरी घेऊन जा आणि त्यावर अब्बा-अम्मीची सही घेऊन ये”. पुन्हा दोघंही पुरते चक्रावून गेले. रामू बुचकळ्यात पडला की शिक्षक बरोब्बर झाकिरचीच निवड का करतात? मला का अर्ज दिला नाही?
रामू आणि झाकिर दोघेही विचारी मनाचे होते. एखादी गोष्ट का घडली याचा ते विचार करत असत आणि प्रसंगी ज्येष्ठांना विचारत असत.

रामूने घरी येऊन बाबांना हा प्रश्न विचारला तर ते निरुत्तर झाले. त्यांना हे काही ठाऊकच नव्हते. ते म्हणाले शाळेतील शिक्षकांनाच विचार. झाकिरच्या बाबतही असाच प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी दोघं नेहमीप्रमाणे शाळेत गेले अन् त्यांनी शिक्षकांना विचारले.

आता मोठाच पेच निर्माण झाला. रामू तर विचारत होता की झाकिर ला मिळणारी सवलत मला का नाही? शिक्षकांना सुचेना की ह्या निरागस मनांना काय सांगावे? खरं उत्तर तर एका वाक्यात अन् अत्यंत सोप्पं होतं. रामूला सांगायचं की, “झाकिर केवळ मुसलमान आहे म्हणून त्याला फी माफ आणि शिष्यवृत्ती; तर तू हिंदू आहेस म्हणून तुला काही मिळणार नाही”, खरंतर सरकारी फतवाच तसा होता. पण शिक्षक धजावले नाहीत.

रामूचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पुढे रामू मोठा होईल तेव्हा त्याला समजून येईल की शाळेत नक्की काय झालं. त्याचे ते व्रण कायम राहतील. आपल्या कष्ट करणाऱ्या बापाला केवळ तो हिंदू असल्यामुळे सवलत मिळाली नाही हे समजायला रामूला वेळ लागणार नाही. तर आपला बाप हा पैसे भरू शकत असताना आणि तयारी असताना सरकारने आपल्याला मिंधं का बनवलं हे न कळायला झाकिर काही कायम लहान राहणार नव्हता.

जैन, बौद्ध,शीख, मुस्लीम, ख्रिश्चन ह्या सर्वांना सवलती देऊन सरकार केवळ आणि केवळ हिंदूंना बाहेर ठेवते आहे हे त्यांना कळून चुकणार होते. किंबहुना ह्या सर्वांना सवलती देणार ह्याचाच दुसरा अर्थ असा की ‘हिंदू असाल तर तुम्हाला सवलती मिळणार नाहीत’. हा भेद राष्ट्रीय जीवनाच्या खोलवर रुतवणारे किती पापराशी जमा करत आहेत ह्याचा हिशोब कोणीच लावू शकणार नव्हते.

रामू अन् झाकिर ची दृष्ट लागण्याजोगी मैत्री यामुळे अजिबात बदलणार नव्हती पण एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र बदलणार होती हे नक्की...





Saturday, February 1, 2014

दगडू, खळ्ळखटॅक आणि दगडू...

दुपार झाली. दगडू उठला. माध्यान्हिक आटोपताच चहा हजर झाला. दगडूने पेपरवर नजर फिरवली. साहेबांचा आदेश वाचला “इंग्रजी पाट्यांना काळे फासा.” दगडू खुशीत आला. त्याला ‘काम’ मिळाले. साहेब म्हणतच तर असतात ‘प्रत्येक हाताला काम!’. दगडूने फोनाफोनी केली आणि चार रिकामटेकडी टाळकी जमवली. २ जण एयरपोर्टवर नाईट शिफ्ट करून आलेले आणि एकाची चायनीज गाडी संध्याकाळी लागायची होती, एक जण नोकरीच्या शोधात होता.
दगडू म्हणाला “आपला नाव झाला पायजेल अशी पाटी निवडूया”. कार्यकर्ते सुचवायला लागले - घेलाशेठ वेलजी चं किराणा मालाचं दुकान आहे... नवीनच झालंय... इंग्रजी नाव लावलंय साल्याने...  ‘वेणीचंद किरोडीमल सुपर मार्केट’. विचारलं तर म्हणतो, ‘ते आमचे वडिल्ची याद में’.. त्यालाच काळं फासूया. अरे ते ‘महावीर ग्लास वर्क्स’ आहे ना ते फोडू. असे विविध पर्याय समोर आल्यावर दगडू विचारमग्न झाला. घेलाशेठ ने गणपतीला २००० मोदकांचं सामान मोफत दिलं होतं. आणि महावीर ने गड क्र. XX च्या खिडक्या आणि दरवाज्यासाठी फुकट काचा दिल्या होत्या. एकदम दगडूला आठवलं की आपल्या मुलाची शाळा ‘सर्वोदय हायस्कूल’! सायबांची मुलं ‘बाम्ब्ये स्काटीश’ मधे असल्याने आपणही इंग्रजी माध्यमात घातलेल्या आपल्या मुलाच्या शाळेचं नाव. इंग्रजी पाटी. तेवढाच शाळेत आपला बोलबाला पण होईल. चला रे...
अशीच एक दुपार.. साहेबांचा आदेश “xx मोबाईल कंपनी मराठीतून उद्घोषणा करत नाही”. फासा काळे, फोडा काचा. चला रे... पण मध्येच स्थानिक नेत्याचा फोन – आंदोलन तूर्तास करायचे नाहीये. बोलणी झाली आहेत. दगडू शांत.
अशीच एक दुपार.. साहेबांचा आदेश “.......” . . . चला रे...
आताशा दगडू समजून चुकला होता की सारखे काळे लागते, सारखे सारखे दगड लागतात. म्हणून दगडूने ‘दामले आणि कंपनी’ च्या दुकानातून धाक दाखवून २ बुधले काळा रंग आणून पक्याच्या ग्यारेजमधे ठेवला होता. आणि चंदूला दगड जमवून ठेवायला सांगितले होते. हो, मराठीच्या रक्षणासाठी सदैव तयार राहायला हवे. साहेब सुद्धा अहोरात्र झटत असतात पक्षवृद्धीसाठी!
आणि अशातच साहेब गरजले “टोल भरू नका..कोणी आडवे आले तर तुडवा”.. झाले...दगडू गीअरमधे ...एव्हाना दगडू चा कार्यकर्ता संच वाढला होता. पण सुरुवातीचे शिलेदार अंगावर केसेस आल्याने हैराण होऊन मागे पडले होते. घरची दुखणी, स्वतःच्या केसेस आणि पैसे याचे गणित घालत ते शिलेदार दगडूचा चेहराही पाहण्यास तयार नव्हते. पण दगडू ला कुठे पर्वा होती. मराठीच्या संरक्षणासाठी एवढा त्याग तर करावाच लागणार ना. शिवाय दोघे गेले तर चौघे येतील अशी स्थिती होती. दगडूवर स्थानिक नेत्याचा वरदहस्त असल्याने त्याला काही चिंता नव्हती... शेवटी मुलाचे डोनेशन भरलेल्या आणि मुलीला कॉलेजात अॅडमिशन मिळवून दिलेल्या स्था.ने.साठी एवढे करायलाच हवे. आता दगडू चांगलाच तयार झाला होता. ‘आदेश दिला की आंदोलन सुरु करायचे आणि संदेश मिळाला की बंद करायचे’ त्यानुसारच दगडू आपल्या प्रदेशातील कार्यकर्त्यांना निर्देश द्यायचा.. हल्ली तर दगडूच सांगू शकतो बोलणी कधी फलद्रूप होणार आणि आंदोलन कधी बंद होणार. कार्यकर्ते भक्तिभावाने दगडू कडे पाहतात. हल्ली त्याच्या वेशातसुद्धा आमूलाग्र बदल झालाय. आधी रंगीत पण साधे शर्ट घालणारा दगडू आता कडक खादीचा पांढराशुभ्र शर्ट घालतो. पहिली दोन बटणे उघडी टाकणे गरजेचे. गळ्यात पूर्वी मारुतीच्या काळ्या दोऱ्यात अडकवलेलं साईबाबांचं लॉकेट असे तिथे आता सोन्याची जाड साखळी आलीये. त्यात वाघनखं. कपाळावर उभे गंध. मनगटात जाड साखळी. बोटांत आंगठ्या. ४ मोबाईल्स. तोंडात पान आणि तत्सम. आपले आयुष्य मार्गी लागले ते केवळ साहेबांमुळे असं सांगायला दगडू कधीच विसरत नाही. ‘साहेब नसते तर आज आपण कुठे असतो याचा विचारही करवत नाही’ असं तो साश्रुनयनांनी आणि सद्गदित कंठाने म्हणतो. आपल्या वडिलांनीसुद्धा पूर्वी खस्ता खाल्ल्या आणि पक्ष वाढवला पण त्यांना कोणी मान दिला नाही ही खंत तो बोलून दाखवतो. खिशातले पैसे खर्च करून पत्रक छापल्याचे आणि आईने घरी बनवून दिलेली खळ घेऊन सायकलवरून पत्रके चिकटवीत निघालेल्या आपल्या गरीब बापाचे खरे चित्र तो उभे करतो. साहेबांच्या साहेबांची १४ कोटीची घोषित संपत्ती असल्याचे वृत्त त्याला विचलित करत नाही! एकूण दगडू स्वतःच्या ‘कर्तबगारीवर’ खूष आहे. आता त्याला पुढे नगरसेवक म्हणून तिकीटसुद्धा मिळेल अशी अटकळ अनेकजण बांधतात. अशातच साहेबांनी मुलाखती घेणार असं जाहीर केलंय. त्याने ३ नवीन खादीचे शर्ट्स खरेदी (‘राणावत फैशन्स’ मधून मोफत!) केलेत. दगडू स्वप्नं पाहतोय..
असाच एक दिवस उजाडतो तो दगडूचे विश्व हलवून सोडत. आईला छातीत असह्य कळा सुरु होतात. दगडू फोनाफोनी करतो. पक्षाची रुग्णवाहिका त्वरित येते. त्यावर स्था.ने. चा फोटो आणि वकुबानुसार लहानमोठे असे अजून ४३ फोटो असतात! आईला घेऊन प्रवास सुरु होतो. त्या विभागातील सर्वोत्तम हॉस्पिटल पाऊण तासावर असते. वाटेत एका ठिकाणी रास्ता रोको असतो. दगडूच्याच पक्षाचा आणि साहेबांच्याच आदेशानुसार. टायर्स ना आगी लावून टाकलेल्या असतात. रस्ता बंद असतो. दगडू चरफडतो. बाजूच्या गल्लीतून काढून म्हणजे १५ मिनिटं अधिक मोडणार. प्रवास सुरु. पुढे एका ठिकाणी प्रचंड वाहनकोंडी कारण अर्ध्याहून अधिक रस्त्यावर कार्यक्रमाचा दादागिरी करून घातलेला मंडप. धीम्या गतीने पुढे. प्रवास सुरूच. पुढे शाळेच्या बाहेर गलका आणि जोरदार आंदोलन. कार्यकर्ते कुंड्या उचलून फेकताय्त कारण ५० रु. शुल्कवाढ झालीये. पुन्हा बाजूच्या गल्लीत. अजून १० मिनिटं मोडणार. प्रवास सुरु. दिसायला लागले हॉस्पिटल. पण एवढा शुकशुकाट का ते दगडू ला कळेना. जवळ गेल्यावर समजले की आज पहाटेच ‘साहेबांच्या’ एका नातेवाईकाचे निधन ह्या इथे झाले जो इथे ६ दिवस उपचारात होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. डॉक्टर्स चिडून संपावर गेलेय्त. दगडू चरफडला – साला त्याला मरायला आणि ह्यांना आंदोलन करायलाही हाच दिवस मिळाला..रुग्णवाहिका गर्रकन फिरवून दुसऱ्या हॉस्पिटलकडे प्रवास सुरु. जिथे पोहोचायला १ तास लागणार. वाटेत साहेबांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन. कार्यकर्त्यांच्या दुचाक्या, झेंडे, अरेरावी. प्रवास सुरु. हॉस्पिटल आले. पण साहेबप्रणित कर्मचारी संघटनेचा संप. शेवटी स्वतः व्हीलचेअर आणून त्यात आईला बसवले आणि ढकलत ढकलत डॉक्टरांकडे नेईपर्यंत आईचे प्राणोत्क्रमण. दगडू सुन्न.
...सर्व आटोपून घरी आल्यावर दगडू विचारमग्न. साला काय मिळवलं आपण! आणि काय गमावलं! ज्या आईने तळहातावरच्या फोडासारखं जपून आपल्याला वाढवलं तिला साधे उपचारदेखील आपण मिळवून देऊ शकलो नाही. काय अर्थ राहिला. हे सारं कशामुळे, कोणामुळे? आपणसुद्धा असे काहीजणांच्या दुःखाला आणि नुकसानाला कारणीभूत असू का? हे बंद नको का व्हायला? हे कधी शाळा नाही काढू शकले, अवैध धंदे नाही बंद करू शकले, बांबू,  दांडा,  उखडू,  फोडू,  गाडू,  छाटू,  कापू अशी भाषा यांनी कधी बांगलादेशींविरोधात नाही वापरली. दगडू चं डोकं गरगरायला लागलं. ग्लानीत तो झोपून गेला. दुसऱ्यादिवशी उठला तेच मुळी एका ठराविक विचाराने. मी नाही या निरर्थक भानगडीत पडणार. तरुणांना यात गुंतवून त्यांची आयुष्य आणि घरंदारं मी नाही उद्ध्वस्त करणार. आता चांगले जगायचे. ही घाण अधिक नाही वाढवायची. होता होईल तो अधिकाधिक जणांना शहाणे बनवायचे. आपण पोळून निघालो तर खरेच पण या युवकांना नाही जळायला द्यायचे.
दगडू आता कष्ट करतो. साहेबांच्या आदेशाशी त्याला देणंघेणं नाही. आईच्या फोटोला नमस्कार करताना तो चांगलं वागण्याची आठवण स्वतःच्या मनाला करून देतो.

पण असे गल्लोगल्लीतले ‘दगडू’ सुधारायला त्यांच्या आईला जावंच लागेल का...