"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, November 26, 2017

अनामवीरा - २

अनामवीरा या मालिकेतील दुसरे पुष्प गुंफताना आज आपण पाहणार आहोत श्री गेंदालाल दीक्षित यांचे संक्षिप्त चरित्र .



गेंदालाल यांचा जन्म तीस नोव्हेंबर १८८८ रोजी आताच्या उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील माई गावी झाला . वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर वडील भोलानाथ दीक्षित यांनी त्यांचा सांभाळ केला . गावीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इटावाच्या सरकारी हायस्कूलात त्यांनी पुढचे शिक्षण घेतले आणि आग्र्याहून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले . औरैया येथील शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली . राष्ट्रकार्याचा योग काही जणांच्या कपाळीच लिहिलेला असतो . त्यामुळे ते कुठेही असले, कुठल्याही नोकरीधंद्यात-व्यवसायात असले तरी तो योग त्यांना स्वस्थ बसू देत नाही.. तसेच काहीसे गेंदालाल दीक्षित यांचे झाले . 
जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचा घाट घातला तेव्हा स्वदेशी चळवळ संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली. त्याच सुमारास  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ज्वलंत अग्रलेख वाचून पंडित गेंदालाल दीक्षित यांच्याही मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली. आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे, या स्वातंत्र्यप्राप्तीच्या यज्ञामध्ये आपणही योगदान दिले पाहिजे असे त्यांच्या मनाला वाटू लागले . त्यावेळी लोकमान्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला शिवजयंती उत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता उत्तर भारतातही त्याचे अनुकरण व्हावे असे दीक्षित यांना वाटू लागले . त्यासाठी त्यांनी शिवाजी समितीची स्थापना केली . नोकरीमध्ये सुट्टी घेऊन जवळच्याच ग्वालियर किंवा ग्वाल्हेर संस्थानात ते जाऊन पोहोचले . ग्वाल्हेर संस्थानातील लोक हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आणि शिवाजी महाराजांप्रती कमालीचा आदर असणारे होते . तिथली बरीच कुटुंबं मूळची  महाराष्ट्रातीलच होती . दीक्षित यांनी तिथल्या तरुणांना स्वातंत्र्यलढयात सहभागी होण्याचे आणि त्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याचे आव्हान केले . 
शिवाजी समितीच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे साहित्य छापून आणायला सुरुवात केली . राष्ट्रकार्यात जुंपलेल्या प्रचारकाचे काम दुहेरी स्वरूपाचे असते, सज्जन लोकांना शक्तिशाली बनवणे आणि शक्तिशाली लोकांना सज्जन बनवणे अशी दोन्ही कामे त्याला करावी लागतात . त्यामुळेच मध्य प्रदेशातील भिंड आणि मुरैना भागातील दरोडेखोरांकडे गेंदालाल दीक्षितांचे लक्ष न वळते तरच नवल . ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी कावा वापरून औरंगजेब आणि अन्य मुघल सरदारांच्या फौजांना सळो की पळो करून सोडले होते त्याप्रमाणेच केंदाला दीक्षितांनी या दरोडेखोरांना शस्त्रास्त्रे जमून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले . याच दरोडेखोरांनी आग्रा आणि ग्वालियर जवळच्या ग्रामीण भागात दरोडे घालून दीक्षितांना अर्थसहाय्य करायला सुरुवात केली . 
सोमदेव नावाच्या एका क्रांतिकारकांनी दीक्षित आणि रामप्रसाद बिस्मिल यांची ओळख करून दिली . रामप्रसाद बिस्मिल यांनी शाहजहांपूरमध्ये मातृवेदी नावाची एक संघटना स्थापन केली होती. त्यामुळे रामप्रसाद बिस्मिल व गेंदालाल दीक्षित यांची भेट झाली तर त्यातून दोघांच्याही कार्याला पुष्टी मिळेल असा विचार सोमदेव यांनी केला . 
२८ जानेवारी १९१८ ला बिस्मिल यांनी ‘देशवासियों के नाम संदेश’ या नावाने एक पत्रक बनवले आणि ते सगळीकडे वितरित केले . त्यातल्या ‘मैनपुरी की प्रतिज्ञा’ या कवितेचा विशेष परिणाम जनमानसावर झाला . त्याच्यानंतर तीन ठिकाणी छापे घालून निधी उभारणी करण्यात आली . पोलिसांनी पत्रक छापणाऱ्यांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बिस्मिल पोलिसांच्या हाती लागले नाहीत . पुढे दिल्ली व आग्र्याच्या मध्ये अजून एका छाप्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना मिळालेल्या खबरीनुसार बिस्मिल व त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला . कमालीचे चपळ असलेल्या बिस्मिल यांनी यमुना नदीमध्ये उडी घेतली आणि पाण्याखालून पोहत पोहत तीर गाठला . पोलिसांना वाटले की बिस्मिल यांचा अंत पाण्यात बुडून झाला . त्याचवेळी दलपतसिंह नावाच्या युवकाने केलेल्या फितुरीमुळे श्री गेंदालाल दीक्षित आणि त्याच्या काही साथीदारांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश मिळाले. त्यांना पकडून आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवण्यात आले . 
बिस्मिलनी आग्र्याच्या किल्ल्यात दीक्षितांची भेट घेतली आणि पलायनाचा बेत आखला; परंतु तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच दीक्षित यांना मैनपुरीला  नेण्यात आले जेथे त्यांच्याविरुद्ध ‘मैनपुरी कटाचा खटला’ दाखल करण्यात आला . दीक्षितांनी उत्तर प्रांतातल्या दरोड्यांचा खुलासा करण्यासाठी आपण तयार असल्याचे दाखवले आणि पोलिसांनी त्यावर विश्वसून त्यांना मातृवेदी संघटनेच्या तरुणांबरोबर कैदेत ठेवले . मैनपुरीच्या तुरुंगाधिकाऱ्यांना श्री गेंदालाल दीक्षित यांनी असे पटवून दिले की सरकारी साक्षीदार रामनारायण यांना त्यांच्याबरोबर जर ठेवले तर अजून काही जणांचा पर्दाफाश करता येईल आणि त्यांना सुद्धा पकडता येईल . तुरुंगाधिकाऱ्यांनी श्री गेंदालाल दीक्षित व सरकारी साक्षीदार रामनारायण यांना एकाच हातकडीने बांधून ठेवले . पण क्रांतिकार्यात तरबेज असलेल्या दीक्षित यांनी रामनारायण यांच्यासकट कैदेतून पोबारा केला  . मैनपुरीच्या पोलीस जेलमधून गेंदालाल  दीक्षित निसटले आणि दिल्लीला जाऊन राहिले . एक नोव्हेंबर १९१९ ला मैनपुरीच्या मॅजिस्ट्रेटनी, श्री बी एस क्रिस यांनी, सर्व आरोपींविरुद्ध निर्णय घोषित केला आणि दीक्षित व रामप्रसाद बिस्मिल यांना फरार म्हणून घोषित केले . दीक्षितांनी वेषांतर करून दिल्लीतील आपले घर गाठले परंतु त्यांच्या वडिलांनी आपल्यावर आणि घरावर बला नको म्हणून पोलिसांना कळविण्याचा निर्णय घेतला . दीक्षितांनी कशीबशी  वडिलांची समजूत काढली व घर सोडण्याचा निर्णय घेतला . दोन तीन दिवसांत घर सोडून गेंदालाल निघाले दिल्लीतील एका प्याऊवर त्यांनी नोकरी पत्करली . शरीरप्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. टीबीने आता भीषण स्वरूप धारण केले होते . सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या अशा क्रांतिकारकांची सोय स्वतःच्याच काय, पण अन्य कुठल्याही घरात होऊ नये याहून अधिक दुर्दैव ते कोणते!
त्यांनी आपल्या धाकट्या भावाला व पत्नीला बोलावून घेतले. पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू पाहून ते म्हणाले, " तुम रोती क्यों हो ? पत्नी ने रोते हुए उत्तर दिया मेरा संसार में कौन है ?

पंडित जी ने एक ठंठी सांस ली मुस्कुराकर कहने लगे – ‘’ आज लाखो विधवाओं का कौन है ? लाखो अनाथो का कौन है ? 22 करोड़ भूखे किसानो का कौन है ? दासता में जकड़ी हुई भारत माता का कौन है ? जो इन सबका मालिक है वही तुम्हारा भी | तुम अपने आपको परम सौभाग्वती समझना , यदि मेरे प्राण इसी प्रकार देश – प्रेम की लगन में निकल जावे और मैं शत्रुओ के हाथ न आऊ | मुझे तो दुःख तो केवल इतना है कि मैं अत्याचारियों को अत्याचार का बदला न दे सका , मन ही मन में रह गयी | मेरा यह शरीर नष्ट हो जाएगा , किन्तु मेरी आत्मा इन्ही भावो को लेकर फिर दूसरा शरीर धारण करेगी | अबकी बार नवीं शक्तियों के साथ जन्म लेंगे शत्रुओ का नाश करूंगा ‘’ 
उस समय उनके मुख पर एक दिव्य ज्योति का प्रकाश छा गया | आप फिर कहने लगे रहा खाने – पीने का , सो तुम्हारे पिता जीवित है | तुम्हारे भाई है , मेरे कुटुम्बी है ; और फिर मेरे मित्र है जो तुम्हे अपनी माता समझ तुम्हारा आदर करेंगे | "  भावाने त्यांची अवस्था बघून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांच्या पत्नीला एका दुसऱ्या ठिकाणी ठेवून तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला . त्याने बघितले तर पंडितजींचे केवळ मृत शरीर शय्येवर पडून होते . २१ डिसेंबर १९२० ला दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये टीबीने त्यांचे निधन झाले . गेंदालाल दीक्षित म्हणत असत , 
थाती नर तन पाय के, क्यों करता है नेह ।
मुँह उज्ज्वल कर सौंप दे, जिसको जिसकी देह ।।

स्वतः श्री रामप्रसाद बिस्मिल यांनी हिंदीमध्ये गेंदालाल दीक्षित यांचे चरित्र लिहून ते कानपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभा नावाच्या नियतकालिकात तीन सप्टेंबर १९२४ च्या अंकात अज्ञात या टोपणनावाने लिहिले आहे . 
दिल्लीच्या आत्माराम अँड सन्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या मन्मथनाथ गुप्ता यांच्या ‘भारतीय क्रांतिकारी आंदोलन का इतिहास’ आणि प्रभात प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्रीकृष्ण सरल यांच्या ‘क्रांतिकारी कोश’ या पुस्तकांत अधिक माहिती वाचता येईल. 


Saturday, November 18, 2017

अनामवीरा - १

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक आपल्याला माहिती असतात परंतु अशाही अगणित क्रांतिकारकांची मालिका भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होऊन गेली ज्यांच्याबाबत दुर्दैवाने आपल्याला फारशी माहिती नसते.
          अशाच काही क्रांतिकारकांबद्दल आपल्याला अंशरूपाने का होईना थोडीफार माहिती व्हावी, त्यांचे संक्षिप्त चरित्र वाचून आपल्याला त्यांच्याबाबत अधिक वाचण्याची प्रेरणा मिळावी आणि आपल्या कुटुंबातील, परिसरातील शालेय वयोगटातील मुलांना तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ही लेखमाला अवश्य वाचून दाखवावी, म्हणून हा लेखनप्रपंच! दर शनिवारी सकाळी इथेच, या ब्लॉगवर एक नवीन पुष्प!
 यात मुख्यत्वे इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि वाचनालयातील पुस्तके यांच्या आधारे लेख लिहिले आहेत. त्यात काही चुकाही असू शकतील, काही संदर्भही चुकले असण्याची शक्यता आहे; त्यामुळे जाणकारांनी त्यावर अवश्य प्रकाश टाकावा व मला लेखात झालेल्या चुका जरूर सुचवाव्यात ही विनंती.

 आपल्याला ही "अनामवीरा" लेखनमाला कशी वाटली हेही मला प्रतिसाद देऊन अवश्य कळवावे.
१. विष्णू गणेश पिंगळे 


पुण्यातल्या तळेगाव-ढमढेरे येथे जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. ९ भावंडांमधले हे सर्वात लहान. सुरुवातीला तळेगाव येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या महाराष्ट्र विद्यालय या शाळेत प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात ते आले. त्या अलौकिक स्वातंत्र्यसूर्याचा स्पर्श होताच विष्णूच्या मनात स्वातंत्र्यप्राप्ती आणि राष्ट्रप्रेम यांचे बीज न अंकुरते तरच नवल! महाराष्ट्र विद्यालय बंद पडल्यानंतर १९०८ साली तळेगावच्या समर्थ विद्यालयात त्यांना भरती करण्यात आलं. दुर्दैवाने १९१० साली ब्रिटीश सरकारने समर्थ विद्यालयही बंद करून टाकलं. ह्या घटनांवरून त्याकाळी शिक्षणाची आणि त्यातूनही राष्ट्रीय विचार देणाऱ्या शिक्षणाची कशी परवड होत होती हे लक्षात येतं.
विष्णूने पुढे मुंबई गाठली आणि गोविंदराव पोतदार यांच्या ‘पायोनियर अल्कली वर्क्स’ या कंपनीत माहीमला नोकरी करू लागला. इथेही श्रीयुत पोतदार हे राष्ट्रीय विचारांचे होते आणि स्फोटकांच्या बाबतीतले तज्ञ होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विष्णूची ओळख करून दिली. त्यातल्या हरी लक्ष्मण पाटील या वसईला राहणाऱ्या वकिलांशी विष्णूची खास मैत्री झाली. पुढे स्वदेशी चळवळ ऐन भरात असताना जपानी हातमाग उद्योगांपासून प्रेरणा घेऊन पिंगळे यांनी लातूरजवळ स्वतःचा स्वदेशी हातमाग सुरु केला. पण त्यांची मनिषा ही नेहमीच एक अभियंता बनावं अशी होती.
 विष्णू गणेश पिंगळे यांनी अमेरिकेत जाण्याचा आपला मनोदय थोरले बंधू केशवराव यांचेकडे रेल्वेस्थानकावर प्रकट केला. प्रवासाला सुरुवात झाली. हाँगकाँग मार्गे ते अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत १९१२ साली त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग ला प्रवेश घेतला.  अमेरिकेतल्या सिअटेल (Seattle) विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अमेरिकेत असतानाचा ते इंडिअन रेव्होल्युशनरी पार्टीया संस्थेचे सभासद झाले आणि त्यांनी सशस्त्र दलांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरवायला सुरुवात केली. अनेक नावे बदलून आणि वेषांतर करून त्यांनी देशभर प्रवास केला. ठिकठिकाणी ते इंग्रजांच्या विरुद्धच्या असंतोषाची बीजे पेरीत गेले. जनमानस चेतवीत गेले.
गदर कटाचा भाग झाले. ऑक्टोबर १९१४ ला स्वतः पिंगळे, सत्येन भूषण सेन, कर्तारसिंग सराभा आणि काही शीख क्रांतिकारक अमेरिकेतून निघाले. सत्येन आणि पिंगळे चीनमधे काही दिवस थांबले. त्यांचा उद्देश होता तहाल सेन आणि अन्य नेत्यांना भेटून सहकार्याची चाचपणी करणे. डॉ सन् यत् सेन यांचीही भेट चीनमधे झाली. नोव्हेंबर १९१४ ला सत्येन आणि पिंगळे कलकत्त्यात पोहोचले. तिथे सत्येन ने पिंगळेंची ओळख जतिंद्रनाथ मुखर्जी म्हणजेच बाघा जतिन यांच्याशी करून दिली. बाघा जतिन यांच्याशी विस्तृत चर्चा झाल्यावर त्यांनी पिंगळेंना रासबिहारी बोस यांच्याकडे बनारसला पाठवले. बनारस त्यावेळी क्रांतिकारकांचे केंद्र बनले होते. तिथून लाहोर, कलकत्ता, अमृतसर, बनारस असा प्रवास पिंगळे करत राहिले. क्रांतिकारकांमधला दुवा म्हणून कार्यरत राहिले. इंग्रज सैन्याच्या विविध तुकड्यांमधील सैनिकांच्या संपर्कात राहिले. सगळं व्यवस्थित जुळवत आणलं होतं. फेब्रुवारी १९१५ ला उठाव करायचा असं ठरलं. पंजाबमधले २३ वे घोडदळ २१ फेब्रुवारीच्या दिवशी उठाव करून शस्त्रे हस्तगत करून आपल्या अधिकाऱ्यांना मारून टाकणार होते. त्यावर लगेच २६ वी पलटण पंजाबात बंड करणार होती; जो लाहोर आणि दिल्लीच्या उठावांसाठी संकेत ठरला होता. क्रांतिकारकांनी ढाक्यातल्या शीख सैनिकांना आपल्यात सामील करून घेण्यात यश मिळवले होते. जर पंजाबातला उठाव यशस्वी झाला तर हावरा स्टेशनला येणारी ‘पंजाब मेल’ रद्द झाली असती. आणि हाच संकेत तिथल्या उठावासाठी ठरला होता. दळणवळणाची साधने मुळातच तुटपुंजी, वेगवान साधनांचा तर अभाव, आणि वरून इंग्रज गुप्तहेर खात्याची वक्रदृष्टी ह्यातून मार्ग काढण्यासाठी असे संकेत ठरले होते. पण,........
नेहमीचाच शाप पुन्हा एकदा! फंदफितुरी! पंजाब सी.आय.डी. ने किरपाल सिंग नावाच्या अमेरिकेतून परतलेल्या आपल्या गुप्तहेराच्या मदतीने सर्व कट अगदी अंतिम क्षणी यशस्वीरित्या जाणून घेतला. हा किरपाल २३ व्या घोदडळात सैनिक असलेल्या बळवंत सिंग चा भाऊ होता. १५ फेब्रुवारी १९१५ ला लाहोर ला रासबिहारी यांच्याकडे पिंगळेंसकट डझनभर क्रांतिकारक जमले होते. तिथे किरपाल सिंग ने प्रवेश मिळवला होता.
१३०व्या बलुच रेजिमेंटचा रंगून इथला उठाव २१ फेब्रुवारीला मोडून काढण्यात आला. २६ वी पंजाब, ७ वी राजपूत, २४ वा जाट तोफखाना हे सगळे उठाव मोडून काढण्यात आले. फिरोझपूर, आग्रा, लाहोर हे सारे उठाव निर्दयीपणे चिरडून टाकण्यात आले. तरीही कर्तारसिंग आणि पिंगळे यांनी १२ व्या घोडदळ रेजिमेंट मधे मेरठ (मीरत) ला उठाव घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कर्तारसिंग यांना बनारसहून अटकेत घेण्यात आले आणि पिंगळे यांना मेरठहून २३ मार्च १९१५ च्या रात्री अटक करण्यात आली.  
२३ मार्च १९१५ ला त्यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांच्या ताब्यात अति ज्वालाग्राही स्फोटके सापडली. तत्कालीन मुंबई पोलिसांच्या रिपोर्टनुसार ‘लॉर्ड हार्डिंग्ज वर दिल्लीत जो बॉम्ब फेकण्यात आला होता तशाप्रकारचे १० बॉम्ब्स विष्णू पिंगळेंकडे होते’. एक अख्खी रेजिमेंट उडवून देण्यासाठी हे पुरेसे होते. ह्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली. रासबिहारी बोस लाहोरहून मे १९१५ ला जपानला निसटले. ग्यानी प्रीतम सिंग, स्वामी सत्यानंद पुरी, आणि अन्य नेते थायलंड वगैरे देशांमध्ये निघून गेले.
विष्णू गणेश पिंगळेंवर ब्रिटीश सैन्यातील सैनिकांना भडकवण्याचा आणि इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यासाठीचा असंतोष सैन्यदलात पसरवण्याच आरोप ठेवण्यात आला. कर्तारसिंग, हरनाम सिंग, भाई परमानंद यांच्याबरोबरीने ‘लाहोर कटाचा खटला’ डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्ट, १९१५ च्या अंतर्गत निर्मिलेल्या विशेष प्राधिकरणाने एप्रिल १९१५ मधे चालवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. १७ नोव्हेंबर १९१५ ला लाहोर च्या सेन्ट्रल जेलमध्ये त्यांना आणि कर्तारसिंग यांना फासावर चढविण्यात आले. किती त्वरेने हा खटला चालवला गेला असेल पहा. एक तेजस्वी शलाका त्यांच्या रूपाने स्वातंत्र्याच्या नभोमंडळात चमकून गेली, अनेकांना प्रेरणा देऊन गेली, भावी पिढ्यांसाठी राष्ट्रभक्तीचे नंदादीप तेवत ठेवून गेली..
त्यांचे पुण्यस्मरण म्हणून मुंबईतील चिंचपोकळी येथील एका रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे.

पुढील लेख :- vikramwalawalkar.blogspot.in/2017/11/blog-post_26.html