"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, September 30, 2009

गुंडोबांचे प्रताप!


गुन्हेगारीतील राजकारणापेक्षा राजकारणातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे. गुन्हेगारीतील राजकारणाने त्यात सामील असलेल्या गुंडांच्या जीवावर बेतू शकते; परंतु राजकारणातील गुन्हेगारीने संपूर्ण समाजाच्याच जिवाशी खेळ होणार आहे. तडीपार केलेले, गंभीर गुन्हे नावावर असलेले, कुप्रसिद्ध असलेले, आणि दहशत असणारे असे गुंड ही जणू पक्षाची बलस्थाने झाली आहेत.

स्वत: भीतीदायक, दहशत पसरवणारे, समाजविघातक गोष्टी करणारे पक्ष काढू शकत असतील आणि स्वत:च्या अंगावर केसेस असूनही यांना 'उदंड झाली लेकुरे' (सभांना!) असा प्रतिसाद तरुणाई कडून मिळत असेल तर अजून काय सांगावे. यांच्यावरच्या गंभीर गुन्ह्यांची साधी 'किणकिण' सुद्धा बाहेर येऊ नये यातच आपल्या व्यवस्थेचे तीनतेरा दिसून येतात. बोगस रेशनकार्डाँपेक्षा हे भयानक आहे.

परंतु आपण हा विचार करताच नाही. भावनिक आवाहन केले की आपल्याला ते अस्मिता टिकवण्याचे आव्हानच वाटते आणि आपण वाहावत जातो. स्वप्न रंगवून दिले की आपण ते पहायला मोकळे! भीतीचा बागुलबोवा उभा करायचा आणि मी यातून तुम्हाला वाचवू शकतो असा आभास निर्माण करायचा.

या निवडणुकीत आपण उमेदवाराचा विचार करुया. अपक्ष असला तरी चालेल. परंतु गुंड आणि दहशतवादी नको. आणि एकाहून अधिक चांगले उमेदवार असतील तर ज्या पक्षाची ध्येयधोरणे पटतात त्याला मत देऊया. ही निवड फारशी कठीण नाही. आणि अपक्ष जास्ती प्रमाणात निवडून आले तर 'घोडेबाजार' अथवा अस्थिर सरकार यांचीही भीती वाटायचे कारण नाही कारण निवडून दिलेले अपक्ष हे चांगलेच असतील. शिवाय 'स्थिर' सरकार काय दिवे लावते आहे ते आपण पाहिलेच आहे.

त्यामुळे चांगला, सुशील, सच्छील उमेदवार हीच आपली निवड असू द्या.

Tuesday, September 29, 2009

बंडोबांचे प्रताप!

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु ही निवडणूक लक्षात राहील ती 'बंडोबांच्या' प्रतापामुळे. सर्व पक्षात एवढे बंडखोर निघालेत आणि निवडणुकीला उभे आहेत की महाराष्ट्राच्या वैचारिक वारश्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहावे. चमत्कारिक बाब ही आहे की फुटून आलेल्या बंडखोराला लगेच तिकीट मिळते?!?! ज्या पक्षाला, त्याच्या ध्येयधोरणाला आपण शिव्या मोजत आलो, टीका करत आलो, त्याच्याच तिकीटावर आपण उभे राहायचे? त्याचा प्रचार करायचा? आणि लोकांना आवाहन करायचे की त्या पक्षाला (नव्हे, मला स्वतःला!) मत द्या? सर्वच प्रकार हास्यास्पद आहे आणि त्याहीपेक्षा चिंताजनक आहे. वैचारिक बांधिलकी ही सत्तेच्या आणि फायद्याच्या दावणीला बांधलेल्या या शुभ्र पोषाखातील जनावरांकडून आपण कायदे बनण्याची आशा करायची? बंडखोरांना जमीन दाखवली पाहिजे.

Monday, September 28, 2009

सप्रेम नमस्कार,
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ब्लॉग सुरु केला आहे. सहाजिकच विचार येतो की ब्लॉग लिहिण्यामागचे कारण काय? ही व्यक्तिगत दैनंदिनी नव्हे..कारण ती ह्या 'वैश्विक चव्हाट्यावर" (internet) मांडण्याची काहीच गरज नाही. मग हे लेखन नक्की काय असेल? दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक अशा विविध पैलूंचं आपल्याला जे दर्शन होतं आणि त्याने आपल्या मनात जे तरंग उठतात त्याचं प्रकटीकरण असेल. नियमित सातत्याने लेखन करण्याचा प्रयत्न राहील..मसालेदार लेखनापेक्षा मासलेवाईक आणि खुसखुशीत वाचनासाठी जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला! प्रतिक्रियांचे स्वागत आहे. ब्लॉग सुरु करण्यामागे ज्या २ मित्रांची प्रेरणा आहे त्या वेधस आणि शतानंद ह्यांचेही आभार.
आपला,
विक्रम.