"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, January 29, 2010

हे महान भरत देश

हे महान भरत देश तुजसि कोटी वंदना ॥ध्रु॥

तूच देव मंदिरात भाव तूच या मनी
शक्ति या करात तुच स्वप्न तूच लोचनी
अंतरात तूच प्राण हृदयि तूच प्रेरणा ॥१॥

ही कृतार्थ वैखरी तुझेच गीत गाउनी
लोचनास धन्यता तुझेच रूप पाहुनी
भक्तिचा असे तुझ्याच गंध देह चंदना ॥२॥

स्तोत्र भारता तुझे अम्हास वेदमंत्र तो
श्वासधूप प्राणदीप आरतीस तेवतो
आयु सर्व वाहिले पदी तुझ्याच पावना ॥३॥

हे गीत ऐकण्यासाठी --> http://www.geetganga.org/हे-महान-भरत-देश-he-mahāna-bharata


Thursday, January 28, 2010

नक्षलवाद : समजा आणि समजवा.

नक्षलवाद हा आज दहशतवादापेक्षा भयावह झाला आहे. पश्चिम बंगालच्या 'नक्षलबारी' या खेड्यातून उगम पावलेल्या या वळवळीने आज खूप पाय पसरले आहेत. भारताला नामोहरम करू पाहणाऱ्या विदेशी शक्तींच्या
सहाय्याने आणि नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे हे तण पसरले आहे. परंतु त्याचे सुप्त आणि उघड समर्थकही काही कमी नाहीत!

नक्षलवादी वळवळीचे समर्थन करू पाहणारा मोठा वर्ग आज प्रसारमाध्यमे आणि बुद्धीजीवी वर्गामध्ये आहे. विकास न झाल्याने आणि संसाधने उपलब्ध न झाल्याने हा तथाकथित 'लढा' उभा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा शोषित आणि अविकसित वर्ग आहे हे खरेच, परंतु हा सर्व प्रयत्न विकासासाठी चालू आहे का? ह्यातून विकास साध्य होईल का? ह्या नक्षलवादी गटाला हाताशी धरून कोणकोण आपली पोळी भाजू पाहत आहेत? हे चिंतनीय बिंदू आहेत.

चारू मुजुमदार ने पश्चिम बंगालच्या दार्जीलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबारी खेड्यातून हा 'लढा' सुरु केला. ते साल होते १९६७. ७० दिवसांच्यावर हा 'लढा' चालला. त्यात एक पोलीस अधिकारी आणि ९ वनवासी मारले गेले. मग घडामोडींनी वेग घेतला आणि 'हत्या' करणं हे विशेष नसून ते ज्या तत्त्वज्ञानात अनिवार्य आणि करणीय म्हणून सांगितलंच गेलं आहे अशा साम्यवादी विचारसरणीचा आधार त्याला मिळाला. त्याचवर्षी म्हणजे १९६७ साली १२-१३ नोव्हेंबर ला देशभरातील 'कॉम्रेड्स' भेटले आणि त्यांनी CPI-M च्या अंतर्गत "All India Coordination Committee of Revolutionaries (AICCR) in the CPI (M)" ची स्थापना केली. म्हणजेच ज्याला "माओवादी कम्युनिस्ट पक्षांतर्गत क्रांतिकारकांची अखिल भारतीय समन्वय समिती" असं म्हणता येईल. आणि तरीही कम्युनिस्ट आपला संबंध नक्षली वळवळीशी असल्याचे नाकारतात! म्हणजे पोराला उंडारायला सोडायचं, खूनखराबा करायला प्रोत्साहन द्यायचं, मदत करायची आणि मग कालवा झाला की मागल्या दाराने आत घेऊन 'तो आता इथे नाहीच!' असं बोंबलायचं.


नक्षली त्रासाचा उगमस्त्रोत आणि पूर्वपीठिका समजून घेण्यासाठी एवढा इतिहास पुरेसा आहे. विकास झाला नाही, शोषित राहिलो आहोत, अन्याय होत आहे, संसाधने नाहीत असं म्हणून ज्यांनी हा लढा उभा केला, ते 'पीपल्स वॉर ग्रुप' स्थापन करू शकतात. ते 'पीपल्स लिबरेशन आर्मी' स्थापन करू शकतात. चीनची मदत घेऊ शकतात. जिहादी कट्टरपंथींबरोबर हातमिळवणी करू शकतात. शस्त्रास्त्र, बंदुका, दारुगोळा, निधी मिळवू शकतात. सरकारशी दीर्घकाळ लढू शकतात. हजारो निरपराध्यांचे मुडदे पाडू शकतात... आणि तरीही वर 'अविकसित' राहिल्याचे रडगाणे गाऊ शकतात? हा बागुलबुवा काही अराष्ट्रीय शक्तींनी एकत्रित येऊन उभा केला आहे. इथल्या शोषित, वंचित समाजाला त्यांनी हाताशी धरून धरून हा कुटील डाव चालवला आहे.

परंतु श्रीमंत प्रसिद्धीमाध्यमांतील तथाकथित 'विचारवंत' हा विचार कधी आपल्यासमोर ठेवतील का? अखंड बातम्यांचा आणि चर्चांचा 'चरखा' चालविणाऱ्या कोणा 'बरखा' ला वंचितांच्या विकासाशी काय देणेघेणे!आपल्या चर्चा 'चालल्या' पाहिजेत म्हणून कोंबडे झुंजविणाऱ्याला आपल्या 'प्राईम टाईम' ची काळजी...नक्षली हल्ल्यात पोलीस मारले गेले तर त्यात त्याला काय 'आगळे वागळे' वाटणार आहे! तेव्हा आपणच सत्य जाणून घेऊन अधिकांना सांगणेच श्रेयस्कर. रशियातील स्टालिन ची दडपशाही, माओ ने चीनमध्ये केलेले अत्याचार यांची पुनरावृत्ती भारतात इच्छिणाऱ्या 'कम्युनिस्ट' देशद्रोह्यांपासून सावध राहायला हवे. साम्यवादी विचारसरणीचा, काहीतरी बाष्कळ पुरावे देऊन प्रगतीशी संबंध जोडणार्या तत्वज्ञान्यांना तिथल्या तिथे 'साम्यवादी चळवळीत (नक्षलवादासह ) देशात आणि जगात आजवर कोट्यवधी निरपराध माणसे मारली गेली' त्याचा जाब विचारायला हवा.

'रॉ' ने दिलेल्या माहितीनुसार आजघडीला २०,००० सशस्त्र नक्षलवादी तयार आहेत आणि ५०,००० नियमित 'कार्यकर्ते' तयार आहेत. याबरोबरच असंख्य 'सहानुभूतीदार' असल्याचेही 'रॉ' चे म्हणणे आहे. सदैव चीनकडे डोळे लावून असणाऱ्या आपल्या देशातील करंट्या कम्युनिस्टांना नेपाळमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर कोण आनंद झाला..आणि तो स्वाभाविकसुद्धा आहे, परंतु सुरक्षेचं काय?
तिबेटवरील चीनच्या हक्काला मान्यता देऊन आपण मूर्खपणा केलाच परंतु नेपाळमध्ये कम्युनिस्ट राजवट येणे हे भारताला सर्वस्वी हानिकारक आहे.
नेपाळपासून पार खाली दक्षिणेपर्यंत 'रेड कॉरीडॉर' जवळपास तयार झाला आहे. आणि चीनने
आपले काम सुरु केले आहे. हे विषयांतर नक्षली उठाव कोणाचा, कोणासाठी बनू पाहात आहे हे समजण्यासाठी.

मानवतेच्या विरुद्ध असणाऱ्या या नक्षलवादाने वनवासींचा, वंचितांचा विकास कधीच होणार नाही, किंबहुना त्या
वळवळीलाही ते अपेक्षित नाही.
मग हा विकास कसा होणार? शासन तर 'शासन' करण्याच्याही पलीकडे गेले आहे. केवळ लोकजागृतीतून आणि लोकसहभागातून हा विकास होऊ शकतो. जेवढ्या या २ गोष्टी वेगवान आणि सशक्त तेवढा विकास अधिक गतिशील. लोकजागृतीमध्ये वरीलप्रमाणे लोकांना सत्य समजावून सांगणे आणि त्यांच्यासमोर या विकासाचे आदर्श नमुने, उदाहरणे ठेवणे याचा समावेश होतो.
लोकसहभागात लोकांनी, म्हणजेच समाजाने तन-मन-धन पूर्वक या विकासयात्रेत सहभागी होणे.
वनवासीविकास, ग्रामविकास, हस्तकला विकास, भटके-विमुक्त विकास असे अनेक प्रयत्न गैरसरकारी माध्यमांतून चालू आहेत. आधीच्या एका लेखात वनवासी कल्याण आश्रमाचा परिचय करून दिल्याने पुनरावृत्तीस्तव इथे टाळतो(पहा : http://vikramwalawalkar.blogspot.com/2009/10/blog-post_09.html ). तशा अन्य अनेक संस्था उदा. वनबंधू परिषद, भटके -विमुक्त विकास प्रतिष्ठान, खादीग्रामोद्योग,विवेकानंद केंद्र, रामकृष्ण मिशन ..आणि कित्येक व्यक्ती उदा. बंग दाम्पत्य, आमटे कुटुंबीय, नानाजी देशमुख, ओझाशंकर...अशांचे कार्य जेवढे परिपुष्ट, जेवढे बलवान होईल तेवढीच देशविभाजक, समाजविघातक नक्षली वळवळ अशक्त होत जाईल. तेव्हा गरज आहे ती हा विचार समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची.

-----------------------------------
संदर्भ : हिंदुस्तान टाईम्स - http://www.hindustantimes.com/News-Feed/nm2/History-of-Naxalism/Article1-6545.aspx ,
Wikipedia.


Thursday, January 21, 2010

'गोल्डमोहर' मधील आग आणि ....

सकाळचा संपर्क, भेटीगाठी आटोपून घरी जात असतानाच सूचना मिळाली की, प्रचंड मोठी आग दादासाहेब फाळके मार्गावरील एका मिलमध्ये लागली आहे. ती आग एवढी भीषण होती की शिवाजी पार्क वरून सुद्धा धुराचे लोळ आकाशात दिसत होते, सूर्य त्या गडद धुरामुळे झाकोळून जात होता. त्याच क्षणी निर्णय झाला की आपण निघाले पाहिजे. रा.स्व.संघाच्या शिवाजी उद्यान रात्र शाखेचा मुख्य शिक्षक संपन्न आणि मी असे दोघे शाखेची खाकी विजार घालून निघालो. मिलच्या मागच्या गेटवर गेलो असता तेथील अग्निशमन दलाच्या अधिकार्याने सांगितले की 'मुख्य प्रवेशद्वाराकडून आत जा, तिथे गरज आहे'. आम्ही धावतपळत मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. जमलेल्या तमाम जनतेला अडवून ठेवले होते. आत एकाही 'नागरिकाला' सोडत नव्हते.
परंतु आम्ही जाताच आम्हाला वाट मोकळी करून दिली व आम्ही सहज आत पोहोचलो. बहुधा शाखेच्या विजारीमुळे हे शक्य झालं!

पुढे आत गेल्यावर प्रत्यक्ष परिस्थितीचं अवलोकन करायला मिळालं. एका विभागाच्या आतील भागात आग लागली होती आणि तापमान प्रचंड वाढले होते. छताचे लाकडी वासे, लाकडी खिडक्या ह्यांनी पेट घेतला होता. अग्निशमन दलाचे बंब आले होते आणि पाईप्स जोडून ते पुढेपर्यंत नेण्याचे काम करायचे होते. एकमेकांत गुंतलेले पाईप्स सोडवून होल्डर मध्ये ते अडकवत पुढे न्यायचे होते. आधी ओरडणारे, हुकूम सोडणारे आणि आतमध्ये आधीपासून असणार्या काही कर्मचार्यांवर खेकसून मध्ये न येण्याचे दरडावणारे अग्निशमन दलाचे अधिकारी बघून भीती वाटली की हे आपल्याला बाहेर तर घालवणार नाहीत! परंतु आम्ही स्वाभाविकपणे दिसणारे काम करायला सुरुवात केली आणि आधी इतरांना पाईपला हात लावू नका असे सांगणारे अधिकारी आम्हाला मात्र स्मितहास्याने स्वीकारत असल्याची खात्री झाली.
पुढे आम्ही त्या हॉलसदृश यंत्र विभागात गेलो. जवान आगीची परवा न करता पुढे जात होते पण आग आणि
बरोबरीने तापमान इतके वाढले की त्यांना थोडे मागे यावे लागले. टेबलं, पट्ट्या, फळ्या असे लाकडी सामान आम्ही ओढून स्थलांतरित केले. बाजूच्या पूर्ण बोळाला (passage) आग लागली होती. वरून छपराचा भाग मध्येच कोसळत होता. आणि खिडक्या जळाल्याने काचा तडकत होत्या.
तिथे तासाभरापेक्षा अधिक वेळ झुंजल्यानंतर अग्निशमन दलाची एक अद्ययावत गाडी आली. ती आत येण्यासाठी आधीचे पसरलेले आणि उच्च दाबाने पाण्याचे वहन करणारे पाईप्स सरकवून रस्ता मोकळा करावा लागला आणि त्यात बर्यापैकी वेळ गेला. उंच शिडी असलेल्या त्या गाडीने काम सुरु करताच आग आटोक्यात येत असल्याचा आभास निर्माण झाला. तेवढ्यात हॉलबाहेरील रस्त्यावर जे जुने दस्तावेज आणि बांबू होते ते धुमसत असल्याचे आमच्या नजरेस आले. मग
तेथीलच एक नळ आणि उपलब्ध मडके घेऊन पाणी भरून नेऊन ती आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. एक छोटा पाईप जणू आमची वाटच बघत होता...तो नळाला जोडला आणि तिथपर्यंत पोहोचला,
मग काम सुकर झाले.

दुपार टळायला आली होती. मग आत झुंजून आलेल्या काही जवानांना पाणी पिण्याची 'आठवण' झाली. त्यांच्यासाठी बाटल्या भरून देणे सुरु केले. बाजूच्या वस्तीतील रहिवासी आम्ही छतावर फेकलेल्या रिकाम्या बाटल्या भरून देण्याचे काम करत होते. हळूहळू आम्ही पुढे सरकलो..पाहतो तर काय खूप पुढेही जवान आतपर्यंत जाऊन आग विझवत होते. त्यातील काही बाहेर आलेले म्हणाले, 'अहो पाणी काय जरा चहा वगैरे..' त्यांची उद्विग्नता चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती. मग आम्ही निघालो चहाच्या कामगिरीवर. गेटवर आलो तर प्रचंड जनसमुदाय. पण चहाची सोय आत हवी आहे हे ज्याला सांगू तो गायब होत होता! मग एक तरुणांचे टोळके उभे होते ते स्थानिक वाटल्याने त्यांच्याजवळ गेलो व 'चहाची टपरी दाखवा' असे म्हणालो तेव्हा ते तयार झाले. टपरीवर चहा तयार झाला आणि एवढा वेळ समंजस वाटणारा दुकानदार म्हणाला 'एक कटिंग ४ रुपया'. नेहेमीपेक्षा छोटा असणारा कप आणि अडचणीची वेळ, धंद्याचे गणित मस्तच जुळले होते! खिशात अत्यंत अपुरे पैसे असतानाही 'ईश्वरी कार्याची जी भक्कम पुंजी' होती त्या आधारावर आम्ही म्हटले ठीक आहे...
आत चहा घेऊन गेलो. सर्व जवान आनंदित झाले. मग हळूच एका अधिकार्याला विचारले, 'साहेब, तुमची काही याबाबतीत व्यवस्था आहे का? यासाठी काही निधी मुक्रर..?'. ते म्हणाले, "अहो तुम्ही कशाला यात पडलात? आम्ही तर सूचना मिळताच तसेच गणवेश चढवून निघतो..पैसे, पाकीट वगैरे काहीच नाही. आणि खरंतर ज्याची जागा आहे त्याने द्यायला हवं." आता त्यांना काय सांगणार आम्ही यात का पडलो? 'स्वयंस्वीकृत' काम असल्याने हा मार्गही 'सुगम' होणार ह्याची खात्री मात्र होती! चहाची टाकी (नळ असलेले छोटे डबा सदृश पिंप!) संपत आली. त्या मुलाने सुरु केले, ''साहब पैसे दे दो. ५० कप हुए. २०० रु.'' मी म्हटलं, ''और लाओ..अभीभी बहोत बचे हैं''. "नहीं साहब, पेहले पैसा दिलवा दो". तेवढ्यात चौकशीसाठी पोलीस आले. त्यांच्याबरोबर मिल व्यवस्थापनाचे काही अधिकारी होते. त्यांना जाऊन भेटलो आणि पृच्छा केली की, "आपले हे जवान सकाळपासून अशा रीतीने झुंजत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ही पाण्याची आणि चहाची सोय केली आहे. तर पैशांचं काय?". तो अधिकारी लगेच तयार झाला. शिवाय आम्ही मग न्याहारीसाठीही प्रयत्न केला. तो म्हणाला बघा किती लोकं आहेत आणि सांगा त्यानुसार..मग आम्ही अंदाज बांधला आणि आमच्या पुढ्यात ७५ वडापावची ऑर्डर दिली गेली. आमचा कार्यभाग झाला होता.

सूर्य अस्ताला जात होता.. ६.३० वाजून गेले होते...आम्हालाही थकवा जाणवू लागला होता. उपस्थित जवानांचा निरोप घेऊ लागलो. प्रचंड तापमान, कोसळणारे छत याची पर्वा न करता, पाण्याचा धो-धो साठा हातात असताना एकही थेंब पिऊ न शकणारे जिगरबाज जवान आमच्यावर बेहद खूष होते. कित्येकजण आम्हाला, 'कोणती शाखा?' 'काय करता?' 'तुम्ही आलात हे फार बरं झालं' असं सांगत होते. सकाळपासूनचा पट डोळ्यासमोरून सरकला तेव्हा जाणवलं की, 'संघकार्य हे ईश्वरी कार्य असल्याचा' आपला विश्वास आणि त्यामुळे आजवर आपल्यावर असलेला लोकांचा विश्वास हा गोल्डमोहर मिलमधील आजच्या आगीमुळे तावून-सुलाखून निघाला आहे आणि त्यावर 'गोल्डमोहर' च जणू लागली आहे!

We are proud of them, but they are confidant about us!