"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, February 19, 2014

रामू आणि झाकिर

गावात एकच शाळा होती. अन् तिथले गुरुजी सर्व वर्ग घ्यायचे. गाव छोटं असल्याने सर्वजण एकमेकाला ओळखत असत. गावातल्या देवपंचायतनाच्या जवळ रामू राहत असे. तिथून डाव्या अंगानं थोडं पुढे गेलं की चढावावर रामूच्या खास मित्राचं म्हणजेच झाकिरचे घर येत असे. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री होती. शाळेत जाताना एकत्र, नदीवर पोहायला जाताना एकत्र, जत्रेला सोबत. मैत्रीची घट्ट वीण जपत दोघंही मजेत जगत होते.

रामूचे वडील ग्रामपंचायत कार्यालयात कारकून होते तर झाकिरचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत कारकून होते. दोघांचीही मैत्री होती. साधारण आर्थिक दर्जा तोच होता. दिवाळीला झाकिर, त्याचा मोठा भाऊ हनिफ आणि धाकटी बहीण रझिया हे रामूच्या घरी कंदील बनवायला जमत असत आणि रामू ईदच्या दिवशी झाकिर बरोबर शीरकुर्म्याचा आस्वाद घेत धूप जाळत असे. मग मजमुआचे अत्तर लावून ऐटीत घरी येणे हा रामूचा ठरलेला क्रम होता.

रामू आणि झाकिर तसे अभ्यासातही सारखेच गुण मिळवत असत. रामूचं गणित चांगलं होतं आणि झाकिर चा भूगोल. दोघांनी एकमेकाला अडलेल्या गोष्टी शिकवायच्या असा जणू अलिखित करारच झाला होता दोघांमध्ये. शाळेत जाताना शिवमंदिरात घंटा वाजवून रामू बाहेर येत असे तर मशिदीच्या धूपाचा अंगारा लावल्याशिवाय झाकिर पुढे जात नसे. त्यांच्या मैत्रीच्या आड या गोष्टी कधीच आल्या नाहीत. रामूचे मंदिरात श्रद्धेने जाणे आणि त्याच, तितक्याच, तशाच श्रद्धेने झाकिरचे मशिदीत जाणे एवढाच काय तो फरक दोघांमध्ये होता. बाकी सर्व सारखे.. घरची आर्थिक परिस्थिती, आई-वडिलांचे शिक्षण, त्यांचे कामाचे तास, पगार, कष्ट, नैसर्गिक अडीअडचणी हे सर्व सारखे. हाकेच्या अंतरावर तर घरे होती दोघांची. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी फुटकी कौले बदलण्याचा कार्यक्रम ठरलेला. एकूण कौलं झाकिरचे बाबा घेऊन येणार आणि मग दोन्ही घरांवर ती कौलं चढणार. तर उन्हाळ्यात लागणारी झापं रामूचे बाबा घेऊन येणार आणि मग दोन्ही अंगणात मस्त सावलीची सोय होणार..

एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे रामू आणि झाकिर मोठे होत होते. एक दिवस वर्गात शिक्षक आले आणि फी गोळा करताना म्हणाले झाकिर, “आजपासून तुझी फी माफ!” रामूला आणि झाकिर ला दोघांनाही प्रश्न पडला की नेहेमीप्रमाणे रामूची फी तर जमा करून घेतली; मग झाकिर ची फी का माफ केली? त्यांनी जास्त विचार केला नाही. शाळा सुटली. झाकिरने फी च्या पैशातील थोडे पैसे खर्च करून चिक्की घेतली आणि दोघंही चिक्की खात खात घरी परतले. 

पुन्हा काही महिन्यांनी अशाच एका दिवशी शिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी झाकिर ला उभे राहायला सांगितले. त्याला फी तर माफ होतीच पण शिवाय आता शिष्यवृत्ती मिळणार होती. शिक्षकांनी त्याला सांगितले की, “आता तुला दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे तेव्हा हा अर्ज घरी घेऊन जा आणि त्यावर अब्बा-अम्मीची सही घेऊन ये”. पुन्हा दोघंही पुरते चक्रावून गेले. रामू बुचकळ्यात पडला की शिक्षक बरोब्बर झाकिरचीच निवड का करतात? मला का अर्ज दिला नाही?
रामू आणि झाकिर दोघेही विचारी मनाचे होते. एखादी गोष्ट का घडली याचा ते विचार करत असत आणि प्रसंगी ज्येष्ठांना विचारत असत.

रामूने घरी येऊन बाबांना हा प्रश्न विचारला तर ते निरुत्तर झाले. त्यांना हे काही ठाऊकच नव्हते. ते म्हणाले शाळेतील शिक्षकांनाच विचार. झाकिरच्या बाबतही असाच प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी दोघं नेहमीप्रमाणे शाळेत गेले अन् त्यांनी शिक्षकांना विचारले.

आता मोठाच पेच निर्माण झाला. रामू तर विचारत होता की झाकिर ला मिळणारी सवलत मला का नाही? शिक्षकांना सुचेना की ह्या निरागस मनांना काय सांगावे? खरं उत्तर तर एका वाक्यात अन् अत्यंत सोप्पं होतं. रामूला सांगायचं की, “झाकिर केवळ मुसलमान आहे म्हणून त्याला फी माफ आणि शिष्यवृत्ती; तर तू हिंदू आहेस म्हणून तुला काही मिळणार नाही”, खरंतर सरकारी फतवाच तसा होता. पण शिक्षक धजावले नाहीत.

रामूचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पुढे रामू मोठा होईल तेव्हा त्याला समजून येईल की शाळेत नक्की काय झालं. त्याचे ते व्रण कायम राहतील. आपल्या कष्ट करणाऱ्या बापाला केवळ तो हिंदू असल्यामुळे सवलत मिळाली नाही हे समजायला रामूला वेळ लागणार नाही. तर आपला बाप हा पैसे भरू शकत असताना आणि तयारी असताना सरकारने आपल्याला मिंधं का बनवलं हे न कळायला झाकिर काही कायम लहान राहणार नव्हता.

जैन, बौद्ध,शीख, मुस्लीम, ख्रिश्चन ह्या सर्वांना सवलती देऊन सरकार केवळ आणि केवळ हिंदूंना बाहेर ठेवते आहे हे त्यांना कळून चुकणार होते. किंबहुना ह्या सर्वांना सवलती देणार ह्याचाच दुसरा अर्थ असा की ‘हिंदू असाल तर तुम्हाला सवलती मिळणार नाहीत’. हा भेद राष्ट्रीय जीवनाच्या खोलवर रुतवणारे किती पापराशी जमा करत आहेत ह्याचा हिशोब कोणीच लावू शकणार नव्हते.

रामू अन् झाकिर ची दृष्ट लागण्याजोगी मैत्री यामुळे अजिबात बदलणार नव्हती पण एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र बदलणार होती हे नक्की...





Saturday, February 1, 2014

दगडू, खळ्ळखटॅक आणि दगडू...

दुपार झाली. दगडू उठला. माध्यान्हिक आटोपताच चहा हजर झाला. दगडूने पेपरवर नजर फिरवली. साहेबांचा आदेश वाचला “इंग्रजी पाट्यांना काळे फासा.” दगडू खुशीत आला. त्याला ‘काम’ मिळाले. साहेब म्हणतच तर असतात ‘प्रत्येक हाताला काम!’. दगडूने फोनाफोनी केली आणि चार रिकामटेकडी टाळकी जमवली. २ जण एयरपोर्टवर नाईट शिफ्ट करून आलेले आणि एकाची चायनीज गाडी संध्याकाळी लागायची होती, एक जण नोकरीच्या शोधात होता.
दगडू म्हणाला “आपला नाव झाला पायजेल अशी पाटी निवडूया”. कार्यकर्ते सुचवायला लागले - घेलाशेठ वेलजी चं किराणा मालाचं दुकान आहे... नवीनच झालंय... इंग्रजी नाव लावलंय साल्याने...  ‘वेणीचंद किरोडीमल सुपर मार्केट’. विचारलं तर म्हणतो, ‘ते आमचे वडिल्ची याद में’.. त्यालाच काळं फासूया. अरे ते ‘महावीर ग्लास वर्क्स’ आहे ना ते फोडू. असे विविध पर्याय समोर आल्यावर दगडू विचारमग्न झाला. घेलाशेठ ने गणपतीला २००० मोदकांचं सामान मोफत दिलं होतं. आणि महावीर ने गड क्र. XX च्या खिडक्या आणि दरवाज्यासाठी फुकट काचा दिल्या होत्या. एकदम दगडूला आठवलं की आपल्या मुलाची शाळा ‘सर्वोदय हायस्कूल’! सायबांची मुलं ‘बाम्ब्ये स्काटीश’ मधे असल्याने आपणही इंग्रजी माध्यमात घातलेल्या आपल्या मुलाच्या शाळेचं नाव. इंग्रजी पाटी. तेवढाच शाळेत आपला बोलबाला पण होईल. चला रे...
अशीच एक दुपार.. साहेबांचा आदेश “xx मोबाईल कंपनी मराठीतून उद्घोषणा करत नाही”. फासा काळे, फोडा काचा. चला रे... पण मध्येच स्थानिक नेत्याचा फोन – आंदोलन तूर्तास करायचे नाहीये. बोलणी झाली आहेत. दगडू शांत.
अशीच एक दुपार.. साहेबांचा आदेश “.......” . . . चला रे...
आताशा दगडू समजून चुकला होता की सारखे काळे लागते, सारखे सारखे दगड लागतात. म्हणून दगडूने ‘दामले आणि कंपनी’ च्या दुकानातून धाक दाखवून २ बुधले काळा रंग आणून पक्याच्या ग्यारेजमधे ठेवला होता. आणि चंदूला दगड जमवून ठेवायला सांगितले होते. हो, मराठीच्या रक्षणासाठी सदैव तयार राहायला हवे. साहेब सुद्धा अहोरात्र झटत असतात पक्षवृद्धीसाठी!
आणि अशातच साहेब गरजले “टोल भरू नका..कोणी आडवे आले तर तुडवा”.. झाले...दगडू गीअरमधे ...एव्हाना दगडू चा कार्यकर्ता संच वाढला होता. पण सुरुवातीचे शिलेदार अंगावर केसेस आल्याने हैराण होऊन मागे पडले होते. घरची दुखणी, स्वतःच्या केसेस आणि पैसे याचे गणित घालत ते शिलेदार दगडूचा चेहराही पाहण्यास तयार नव्हते. पण दगडू ला कुठे पर्वा होती. मराठीच्या संरक्षणासाठी एवढा त्याग तर करावाच लागणार ना. शिवाय दोघे गेले तर चौघे येतील अशी स्थिती होती. दगडूवर स्थानिक नेत्याचा वरदहस्त असल्याने त्याला काही चिंता नव्हती... शेवटी मुलाचे डोनेशन भरलेल्या आणि मुलीला कॉलेजात अॅडमिशन मिळवून दिलेल्या स्था.ने.साठी एवढे करायलाच हवे. आता दगडू चांगलाच तयार झाला होता. ‘आदेश दिला की आंदोलन सुरु करायचे आणि संदेश मिळाला की बंद करायचे’ त्यानुसारच दगडू आपल्या प्रदेशातील कार्यकर्त्यांना निर्देश द्यायचा.. हल्ली तर दगडूच सांगू शकतो बोलणी कधी फलद्रूप होणार आणि आंदोलन कधी बंद होणार. कार्यकर्ते भक्तिभावाने दगडू कडे पाहतात. हल्ली त्याच्या वेशातसुद्धा आमूलाग्र बदल झालाय. आधी रंगीत पण साधे शर्ट घालणारा दगडू आता कडक खादीचा पांढराशुभ्र शर्ट घालतो. पहिली दोन बटणे उघडी टाकणे गरजेचे. गळ्यात पूर्वी मारुतीच्या काळ्या दोऱ्यात अडकवलेलं साईबाबांचं लॉकेट असे तिथे आता सोन्याची जाड साखळी आलीये. त्यात वाघनखं. कपाळावर उभे गंध. मनगटात जाड साखळी. बोटांत आंगठ्या. ४ मोबाईल्स. तोंडात पान आणि तत्सम. आपले आयुष्य मार्गी लागले ते केवळ साहेबांमुळे असं सांगायला दगडू कधीच विसरत नाही. ‘साहेब नसते तर आज आपण कुठे असतो याचा विचारही करवत नाही’ असं तो साश्रुनयनांनी आणि सद्गदित कंठाने म्हणतो. आपल्या वडिलांनीसुद्धा पूर्वी खस्ता खाल्ल्या आणि पक्ष वाढवला पण त्यांना कोणी मान दिला नाही ही खंत तो बोलून दाखवतो. खिशातले पैसे खर्च करून पत्रक छापल्याचे आणि आईने घरी बनवून दिलेली खळ घेऊन सायकलवरून पत्रके चिकटवीत निघालेल्या आपल्या गरीब बापाचे खरे चित्र तो उभे करतो. साहेबांच्या साहेबांची १४ कोटीची घोषित संपत्ती असल्याचे वृत्त त्याला विचलित करत नाही! एकूण दगडू स्वतःच्या ‘कर्तबगारीवर’ खूष आहे. आता त्याला पुढे नगरसेवक म्हणून तिकीटसुद्धा मिळेल अशी अटकळ अनेकजण बांधतात. अशातच साहेबांनी मुलाखती घेणार असं जाहीर केलंय. त्याने ३ नवीन खादीचे शर्ट्स खरेदी (‘राणावत फैशन्स’ मधून मोफत!) केलेत. दगडू स्वप्नं पाहतोय..
असाच एक दिवस उजाडतो तो दगडूचे विश्व हलवून सोडत. आईला छातीत असह्य कळा सुरु होतात. दगडू फोनाफोनी करतो. पक्षाची रुग्णवाहिका त्वरित येते. त्यावर स्था.ने. चा फोटो आणि वकुबानुसार लहानमोठे असे अजून ४३ फोटो असतात! आईला घेऊन प्रवास सुरु होतो. त्या विभागातील सर्वोत्तम हॉस्पिटल पाऊण तासावर असते. वाटेत एका ठिकाणी रास्ता रोको असतो. दगडूच्याच पक्षाचा आणि साहेबांच्याच आदेशानुसार. टायर्स ना आगी लावून टाकलेल्या असतात. रस्ता बंद असतो. दगडू चरफडतो. बाजूच्या गल्लीतून काढून म्हणजे १५ मिनिटं अधिक मोडणार. प्रवास सुरु. पुढे एका ठिकाणी प्रचंड वाहनकोंडी कारण अर्ध्याहून अधिक रस्त्यावर कार्यक्रमाचा दादागिरी करून घातलेला मंडप. धीम्या गतीने पुढे. प्रवास सुरूच. पुढे शाळेच्या बाहेर गलका आणि जोरदार आंदोलन. कार्यकर्ते कुंड्या उचलून फेकताय्त कारण ५० रु. शुल्कवाढ झालीये. पुन्हा बाजूच्या गल्लीत. अजून १० मिनिटं मोडणार. प्रवास सुरु. दिसायला लागले हॉस्पिटल. पण एवढा शुकशुकाट का ते दगडू ला कळेना. जवळ गेल्यावर समजले की आज पहाटेच ‘साहेबांच्या’ एका नातेवाईकाचे निधन ह्या इथे झाले जो इथे ६ दिवस उपचारात होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. डॉक्टर्स चिडून संपावर गेलेय्त. दगडू चरफडला – साला त्याला मरायला आणि ह्यांना आंदोलन करायलाही हाच दिवस मिळाला..रुग्णवाहिका गर्रकन फिरवून दुसऱ्या हॉस्पिटलकडे प्रवास सुरु. जिथे पोहोचायला १ तास लागणार. वाटेत साहेबांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन. कार्यकर्त्यांच्या दुचाक्या, झेंडे, अरेरावी. प्रवास सुरु. हॉस्पिटल आले. पण साहेबप्रणित कर्मचारी संघटनेचा संप. शेवटी स्वतः व्हीलचेअर आणून त्यात आईला बसवले आणि ढकलत ढकलत डॉक्टरांकडे नेईपर्यंत आईचे प्राणोत्क्रमण. दगडू सुन्न.
...सर्व आटोपून घरी आल्यावर दगडू विचारमग्न. साला काय मिळवलं आपण! आणि काय गमावलं! ज्या आईने तळहातावरच्या फोडासारखं जपून आपल्याला वाढवलं तिला साधे उपचारदेखील आपण मिळवून देऊ शकलो नाही. काय अर्थ राहिला. हे सारं कशामुळे, कोणामुळे? आपणसुद्धा असे काहीजणांच्या दुःखाला आणि नुकसानाला कारणीभूत असू का? हे बंद नको का व्हायला? हे कधी शाळा नाही काढू शकले, अवैध धंदे नाही बंद करू शकले, बांबू,  दांडा,  उखडू,  फोडू,  गाडू,  छाटू,  कापू अशी भाषा यांनी कधी बांगलादेशींविरोधात नाही वापरली. दगडू चं डोकं गरगरायला लागलं. ग्लानीत तो झोपून गेला. दुसऱ्यादिवशी उठला तेच मुळी एका ठराविक विचाराने. मी नाही या निरर्थक भानगडीत पडणार. तरुणांना यात गुंतवून त्यांची आयुष्य आणि घरंदारं मी नाही उद्ध्वस्त करणार. आता चांगले जगायचे. ही घाण अधिक नाही वाढवायची. होता होईल तो अधिकाधिक जणांना शहाणे बनवायचे. आपण पोळून निघालो तर खरेच पण या युवकांना नाही जळायला द्यायचे.
दगडू आता कष्ट करतो. साहेबांच्या आदेशाशी त्याला देणंघेणं नाही. आईच्या फोटोला नमस्कार करताना तो चांगलं वागण्याची आठवण स्वतःच्या मनाला करून देतो.

पण असे गल्लोगल्लीतले ‘दगडू’ सुधारायला त्यांच्या आईला जावंच लागेल का...