"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, April 1, 2012

पान, घोडा, भाकरी आणि सरकार.

भूदलप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेली गोपनीय चिट्ठी/पत्र फुटले आणि एका नव्याच गोष्टीला तोंड फुटले. आधीच जनरल अडचणीत आले होते ते जन्मदिनांकाच्या वादामुळे. आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत आणि तीही देशाच्या सुरक्षेबाबत. एकूणात हा सर्व प्रकार दुःखदायक आहे. चिंताजनक सुद्धा आहे.
त्यांचे म्हणणे की भूदलाकडे असलेली शस्त्रात्रे कालबाह्य झाली आहेत. रणगाड्यांना लागणारा दारूगोळा नाही. हवाई सिद्धतेच्या ९७% कालबाह्य आहे. रात्रीच्या वेळी लागणारी (night vision devices etc.) उपकरणे नाहीत. आणि अशा अन्य अनेक भयावह गोष्टी.( http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-03-28/india/31248793_1_army-chief-vk-singh-cbi-probe-bribe-offer)

सेनाध्यक्षांप्रती कितीही आदर आम्हाला असला तरी प्रस्तुत गोष्टीत ते चुकले असंच म्हणावं लागेल. एकतर तुम्हाला फार उशिरा जाग आली.. निवृत्तीला २-३ महिने राहिले असताना. बरं ती भ्रष्टाचाराची मागणी तुम्ही कार्यभार सांभाळल्यावर लगेच झाली होती.. तेव्हाच तुम्ही बोलायला हवे होते. शिवाय मधे जन्मदिनांकाचा वाद झाला, ज्यात तुम्ही सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचलेत. आता तुम्ही राग काढत आहात असं कोणी म्हणालं तर ते चूक ठरू नये. ती चिठ्ठी तुम्ही लीक केली नसेल पण ती तुम्हाला गुप्त ठेवता आली असती नक्कीच. आणि ती जर लीक झालीच असेल तर कशी ते तुम्ही पळभरात शोधून काढून त्याचा निकाल लावता आला असता. तेव्हा त्या लीक होण्यात तुमचा सहभाग नाहीच हे खरे वाटत नाही.

पण यामुळे सरकारला स्वच्छतेचे प्रशस्तीपत्रक मिळत नाही. जनरलनी केलेले आरोप जर खरे असतील तर फार गंभीर आणि देशाच्या जीवावर बेतणारे आहेत. आणि ते खरे असण्याच्या शक्यतेलाच जास्त  वाव आहे असे आम्हाला सेनादलातील भूतपूर्व आणि वर्तमान अधिकाऱ्यांशी बोलल्यावर जाणवले. शिवाय नॉर्दन कमांड चे जनरल कमांडिंग ऑफिसर (GOC) लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनीही या लाच देण्याच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे.( http://indiatoday.intoday.in/story/army-chief-general-v-k-singh-northern-command/1/182416.html). तेव्हा जनरलनी फार काही चूक केले असे वाटत नाही. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा एक डावपेचाचा भाग असू शकतो की, प्रारंभीच कार्यभार सांभाळल्यावर बोलले असते किंवा बोलणार अशी कुणकुण जरी लागली असती तरी लगेच हकालपट्टी केली असती त्यांची. शिवाय अंतर्गत काही पावले उचलता येतात का याचीही त्यांनी चाचपणी आणि त्या दिशेने प्रयत्न केले असतील. पण जेव्हा त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला तेव्हा त्यांनी ही आखणी केली असावी. त्यांना कळून चुकले असणार की ही सरकार नावाची ढिम्म म्हैस भ्रष्टाचाराच्या चिखलातून बाहेर यायला तयारच नाही! एवढे झाल्यावरच त्यांनी हंटर उगारला असावा. कारण आता २-३ महिनेच तर राहिलेत..केले बडतर्फ तर करुद्या. देशहितासाठी बडतर्फ झालो तरी चालेल, कारण नाहीतर निष्ठेशी तडजोड केल्यासारखे होईल.  

दुसऱ्या तर्काला पुष्टी मिळणारी अजून एक बाब असू शकते ती म्हणजे, ही १४ कोटींच्या लाचेची दखल त्यांनी घेतली असेल लगेच..त्याविरुद्ध त्यांनी सरकारदरबारी धावही घेतली असेल..पण उलटपक्षी त्यांनाच सुनावण्यात आले असेल की, ‘लाच गुपचूप स्वीकारा..कारण आमचाही वाटा त्यातून यायचा आहे’. (महाराष्ट्रातील आधीचे काही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, यांनी काय चालवले होते/आहे आपण जाणत नाही काय! जे आडात तेच पोहऱ्यात येणार) म्हणजेच केंद्रात काही फार वेगळे नसणार.. तर अशाप्रकारे जनरलना सुनावण्यात आले असेल. पण माणूस ताठ कण्याचा आणि प्रतिबद्ध असल्याने नकार दिला असणार..तेव्हा मग “थांब. सिस्टीम ला आव्हान देतोस काय! आता तुला दाखवतो”, अशा विचारातून जन्मदिनांकाचा घोळ घातला गेला असणार. जनरलची प्रतिमा डागाळावी हा उद्देश समोर ठेऊन हे प्रकरण घडले असावे.

तेव्हा तर्क विविध असले आणि सर्व शक्याशक्यतांचा खेळ असला तरी केंद्रातील सरकार ने सुरक्षेशी तडजोड केली आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि जनता हतबल आहे ही गोष्ट स्पष्ट दिसून येत आहे. सरकार बदलले पाहिजे. अर्थात भाजप अथवा भाजपप्रणित आघाडीला एवढी दीर्घकाळ सत्ता मिळाली तर तेव्हाही काही वेगळे चित्र नसेल म्हणा. कारण आजवर आपण बरेच चांगल्या शाळेतील ‘नापास’ विद्यार्थी बघितले आहेत! पण तरीही दीर्घकाळ सत्ता काँग्रेस च्या हातात राहिल्याने सध्याचे भयावह चित्र दिसते आहे. तेव्हा पान का सडले, घोडा का अडला आणि भाकरी का करपली ह्या प्रश्नांचे उत्तर मात्र एकच – फिरवले नाही म्हणून! त्यात आता सरकार ची भर पडली आहे इतकच.  


4 comments: