"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, January 28, 2010

नक्षलवाद : समजा आणि समजवा.

नक्षलवाद हा आज दहशतवादापेक्षा भयावह झाला आहे. पश्चिम बंगालच्या 'नक्षलबारी' या खेड्यातून उगम पावलेल्या या वळवळीने आज खूप पाय पसरले आहेत. भारताला नामोहरम करू पाहणाऱ्या विदेशी शक्तींच्या
सहाय्याने आणि नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे हे तण पसरले आहे. परंतु त्याचे सुप्त आणि उघड समर्थकही काही कमी नाहीत!

नक्षलवादी वळवळीचे समर्थन करू पाहणारा मोठा वर्ग आज प्रसारमाध्यमे आणि बुद्धीजीवी वर्गामध्ये आहे. विकास न झाल्याने आणि संसाधने उपलब्ध न झाल्याने हा तथाकथित 'लढा' उभा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा शोषित आणि अविकसित वर्ग आहे हे खरेच, परंतु हा सर्व प्रयत्न विकासासाठी चालू आहे का? ह्यातून विकास साध्य होईल का? ह्या नक्षलवादी गटाला हाताशी धरून कोणकोण आपली पोळी भाजू पाहत आहेत? हे चिंतनीय बिंदू आहेत.

चारू मुजुमदार ने पश्चिम बंगालच्या दार्जीलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबारी खेड्यातून हा 'लढा' सुरु केला. ते साल होते १९६७. ७० दिवसांच्यावर हा 'लढा' चालला. त्यात एक पोलीस अधिकारी आणि ९ वनवासी मारले गेले. मग घडामोडींनी वेग घेतला आणि 'हत्या' करणं हे विशेष नसून ते ज्या तत्त्वज्ञानात अनिवार्य आणि करणीय म्हणून सांगितलंच गेलं आहे अशा साम्यवादी विचारसरणीचा आधार त्याला मिळाला. त्याचवर्षी म्हणजे १९६७ साली १२-१३ नोव्हेंबर ला देशभरातील 'कॉम्रेड्स' भेटले आणि त्यांनी CPI-M च्या अंतर्गत "All India Coordination Committee of Revolutionaries (AICCR) in the CPI (M)" ची स्थापना केली. म्हणजेच ज्याला "माओवादी कम्युनिस्ट पक्षांतर्गत क्रांतिकारकांची अखिल भारतीय समन्वय समिती" असं म्हणता येईल. आणि तरीही कम्युनिस्ट आपला संबंध नक्षली वळवळीशी असल्याचे नाकारतात! म्हणजे पोराला उंडारायला सोडायचं, खूनखराबा करायला प्रोत्साहन द्यायचं, मदत करायची आणि मग कालवा झाला की मागल्या दाराने आत घेऊन 'तो आता इथे नाहीच!' असं बोंबलायचं.


नक्षली त्रासाचा उगमस्त्रोत आणि पूर्वपीठिका समजून घेण्यासाठी एवढा इतिहास पुरेसा आहे. विकास झाला नाही, शोषित राहिलो आहोत, अन्याय होत आहे, संसाधने नाहीत असं म्हणून ज्यांनी हा लढा उभा केला, ते 'पीपल्स वॉर ग्रुप' स्थापन करू शकतात. ते 'पीपल्स लिबरेशन आर्मी' स्थापन करू शकतात. चीनची मदत घेऊ शकतात. जिहादी कट्टरपंथींबरोबर हातमिळवणी करू शकतात. शस्त्रास्त्र, बंदुका, दारुगोळा, निधी मिळवू शकतात. सरकारशी दीर्घकाळ लढू शकतात. हजारो निरपराध्यांचे मुडदे पाडू शकतात... आणि तरीही वर 'अविकसित' राहिल्याचे रडगाणे गाऊ शकतात? हा बागुलबुवा काही अराष्ट्रीय शक्तींनी एकत्रित येऊन उभा केला आहे. इथल्या शोषित, वंचित समाजाला त्यांनी हाताशी धरून धरून हा कुटील डाव चालवला आहे.

परंतु श्रीमंत प्रसिद्धीमाध्यमांतील तथाकथित 'विचारवंत' हा विचार कधी आपल्यासमोर ठेवतील का? अखंड बातम्यांचा आणि चर्चांचा 'चरखा' चालविणाऱ्या कोणा 'बरखा' ला वंचितांच्या विकासाशी काय देणेघेणे!आपल्या चर्चा 'चालल्या' पाहिजेत म्हणून कोंबडे झुंजविणाऱ्याला आपल्या 'प्राईम टाईम' ची काळजी...नक्षली हल्ल्यात पोलीस मारले गेले तर त्यात त्याला काय 'आगळे वागळे' वाटणार आहे! तेव्हा आपणच सत्य जाणून घेऊन अधिकांना सांगणेच श्रेयस्कर. रशियातील स्टालिन ची दडपशाही, माओ ने चीनमध्ये केलेले अत्याचार यांची पुनरावृत्ती भारतात इच्छिणाऱ्या 'कम्युनिस्ट' देशद्रोह्यांपासून सावध राहायला हवे. साम्यवादी विचारसरणीचा, काहीतरी बाष्कळ पुरावे देऊन प्रगतीशी संबंध जोडणार्या तत्वज्ञान्यांना तिथल्या तिथे 'साम्यवादी चळवळीत (नक्षलवादासह ) देशात आणि जगात आजवर कोट्यवधी निरपराध माणसे मारली गेली' त्याचा जाब विचारायला हवा.

'रॉ' ने दिलेल्या माहितीनुसार आजघडीला २०,००० सशस्त्र नक्षलवादी तयार आहेत आणि ५०,००० नियमित 'कार्यकर्ते' तयार आहेत. याबरोबरच असंख्य 'सहानुभूतीदार' असल्याचेही 'रॉ' चे म्हणणे आहे. सदैव चीनकडे डोळे लावून असणाऱ्या आपल्या देशातील करंट्या कम्युनिस्टांना नेपाळमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर कोण आनंद झाला..आणि तो स्वाभाविकसुद्धा आहे, परंतु सुरक्षेचं काय?
तिबेटवरील चीनच्या हक्काला मान्यता देऊन आपण मूर्खपणा केलाच परंतु नेपाळमध्ये कम्युनिस्ट राजवट येणे हे भारताला सर्वस्वी हानिकारक आहे.
नेपाळपासून पार खाली दक्षिणेपर्यंत 'रेड कॉरीडॉर' जवळपास तयार झाला आहे. आणि चीनने
आपले काम सुरु केले आहे. हे विषयांतर नक्षली उठाव कोणाचा, कोणासाठी बनू पाहात आहे हे समजण्यासाठी.

मानवतेच्या विरुद्ध असणाऱ्या या नक्षलवादाने वनवासींचा, वंचितांचा विकास कधीच होणार नाही, किंबहुना त्या
वळवळीलाही ते अपेक्षित नाही.
मग हा विकास कसा होणार? शासन तर 'शासन' करण्याच्याही पलीकडे गेले आहे. केवळ लोकजागृतीतून आणि लोकसहभागातून हा विकास होऊ शकतो. जेवढ्या या २ गोष्टी वेगवान आणि सशक्त तेवढा विकास अधिक गतिशील. लोकजागृतीमध्ये वरीलप्रमाणे लोकांना सत्य समजावून सांगणे आणि त्यांच्यासमोर या विकासाचे आदर्श नमुने, उदाहरणे ठेवणे याचा समावेश होतो.
लोकसहभागात लोकांनी, म्हणजेच समाजाने तन-मन-धन पूर्वक या विकासयात्रेत सहभागी होणे.
वनवासीविकास, ग्रामविकास, हस्तकला विकास, भटके-विमुक्त विकास असे अनेक प्रयत्न गैरसरकारी माध्यमांतून चालू आहेत. आधीच्या एका लेखात वनवासी कल्याण आश्रमाचा परिचय करून दिल्याने पुनरावृत्तीस्तव इथे टाळतो(पहा : http://vikramwalawalkar.blogspot.com/2009/10/blog-post_09.html ). तशा अन्य अनेक संस्था उदा. वनबंधू परिषद, भटके -विमुक्त विकास प्रतिष्ठान, खादीग्रामोद्योग,विवेकानंद केंद्र, रामकृष्ण मिशन ..आणि कित्येक व्यक्ती उदा. बंग दाम्पत्य, आमटे कुटुंबीय, नानाजी देशमुख, ओझाशंकर...अशांचे कार्य जेवढे परिपुष्ट, जेवढे बलवान होईल तेवढीच देशविभाजक, समाजविघातक नक्षली वळवळ अशक्त होत जाईल. तेव्हा गरज आहे ती हा विचार समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची.

-----------------------------------
संदर्भ : हिंदुस्तान टाईम्स - http://www.hindustantimes.com/News-Feed/nm2/History-of-Naxalism/Article1-6545.aspx ,
Wikipedia.


2 comments:

  1. महत्त्वाचा विचार. नक्षल घातक नेमके कसे हे अजून सविस्तर सांगण्याची गरज आहे. तसेच, त्यांना नामोहरम, नव्हे, नष्ट करण्यासाठी आपण दिलेली उदाहरणे अजून तपशिलात सांगायला हवीत.

    आपण नेमकेपणाने लिहिले आहे. अजून लिहावे.

    ReplyDelete
  2. Yes i suggest the same.. write more on dis..
    A year ago our army chief had said tht yet there is no need to get indian army forces against naxalites.. i thnk thats only bcoz there is a difference between naxalites n terrorists.. though if dey r being provocated by china or any other country, then dis must be a serious threat than what it actually seems.. Donnow much regarding dis,bt ll surely like to read more..

    ReplyDelete