"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, August 17, 2016

गोहत्याबंदी, गोरक्षा आणि गोरक्षक

प्रस्तावना - सहिष्णुता हे हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दुसऱ्याची बाजू समजून घेणे, त्याच्या मताचा आदर करणे पण त्याचवेळी आपली तत्वे, निष्ठा यांचा त्याग न करणे हे हिंदू समाजासाठी नवीन नाही. दुसऱ्याला जबरदस्तीने आपले मत मानायला लावणे, अत्याचार करून आपला विचार त्याच्यावर लादणे, दंड देऊन आपला पाईक बनवणे हे हिंदुत्वाला मान्य नाही.
हिंदू हा सृष्टीशी आपले नाते जोडणारा निसर्गपूजक समाज आहे. इथले सण-उत्सव, परंपरा या निसर्गाशी जोडलेल्या आहेत. वटपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा, बैसाखी, बिहू असे कित्येक उत्सव हे सृष्टीशी असलेल्या आपल्या नात्याचे स्मरण करण्यासाठी आहेत. इथल्या कथा-कहाण्या-पुराण यातूनही हा विचार प्रकट होतो. मग देवतांचे वाहन म्हणून अगदी उंदरापासून राजहंसापर्यंत सर्वांना स्थान आहे. खारीपासून जटायूपर्यंत सर्वांनी आपले धर्मरक्षणाचे कर्तव्य येनकेनप्रकारेण बजावलेले आहे.
सहिष्णू याचा अर्थ स्वत्व हरवलेला, स्वाभिमान संपलेला असा होत नाही. त्याचमुळे इथल्या देवता शस्त्रसंपन्न आहेत. आई भवानी, कृष्ण, विष्णू, मारुती, महादेव या सर्वांचे आपापले शस्त्र आहे. पुराणातून अस्त्रांचा उल्लेखही आढळतो. कारण शस्त्रांशिवाय शास्त्रे टिकवता येत नाहीत याची जाणीव हिंदू समाजाला आहे. संस्कृत भाषा पहिली असता हिंसा/मारणे यासाठी विपुल शब्दभांडार, क्रियापदे मिळतील. संस्कृत शब्दकोशातील पान दर पान अशा शब्द-क्रियापदांनी भरलेले आहे. आर्य मांस खातच नसतील असे मी छातीठोकपणे म्हणून शकत नाही. किंबहुना नदीच्या काठावर स्थिर होईपर्यंत, शेतीसाठीचा सलग कालावधी वास्तव्यासाठी मिळेपर्यंत क्षुधाशांतीसाठी आर्य सामिष भोजन करतही असावेत. काही सुभाषितांमध्ये मांस खाण्याचा उल्लेख आढळतो, उपनिषदात मांस शिजवून खाण्याचा विधी आहे. स्वामी विवेकानंदानी मांसाहार करण्याचा स्वीकार केलेला आहे. पूर्वांचलातील काही जनजाती ज्या अजून ख्रिश्चन झालेल्या नाहीत त्यामध्ये अजूनही गोमांस खाल्ले जाते. या सर्वाचा संदर्भ पुढे येईलच पण तूर्तास एवढे निश्चित की इथला समाज हा शाकाहार-मांसाहार याबाबत अत्यंत आग्रही होता असे वाटत नाही.
आपल्या इथे काही गोष्टी या पवित्र मानल्या गेल्या आहेत. तसा संस्कार हिंदू मनावर असल्यामुळे आणि त्याचे नैसर्गिक, व्यावहारिक, शास्त्रीय, प्राकृतिक, वैज्ञानिक फायदे असल्यामुळे. उदा. तुळस, आंब्याची पाने, नारळ, गाय या आणि अशा निसर्गातील घटकांना समाजाने पवित्रता प्रदान केली. ह्यातला गाय हा अत्यंत गरीब प्राणी. उपमाही दिली जाते ‘गरीब गायीसारखा’!
गाय, तिचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणजेच येथील बहुसंख्य जनता प्रामुख्याने शेती, शेतमजुरी, शेतमाल, धान्य, वितरण अन्य उत्पादने त्याचा व्यापार यावर उदरभरणासाठी अवलंबून आहे. आणि भारतातील शेती ही बैल, रेडे यांना नांगराला जोडून केली जाते. बैलांची उत्पत्ती ही गोवंशातूनच होते. गायीचा तर सर्वार्थाने उपयोग होतो. बाळाला मिळणारे आईचे स्तनपान सुटल्यानंतर दूध प्रामुख्याने उपलब्ध होते ते गाईपासून. गाईच्या दुधापासून दही, ताक, लस्सी, चक्का, लोणी, तूप, मस्का, पनीर असे अन्य दुग्धजन्य पदार्थ होतात, ज्याचा केवळ पौष्टिक म्हणून नव्हे, तर समारंभात वा कार्यक्रमात पेढा, श्रीखंड, खरवस, मिठाई, खवा, बासुंदी अशारीतीनेही वापर होतो. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त गायीचा उपयोग मोठा आहे. गोमूत्र, शेणाने जमीन सारवणे, शेणखत, बायोगॅस आणि मृत्यूनंतर चामडे याहीदृष्टीने गाईचा उपयोग होतो. असा अन्य कुठल्याही प्राण्याचा भारतात सर्वार्थाने उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला कामधेनु म्हणून गाईचे महत्व कळायला परिश्रम पडू नयेत. म्हणूनच गाईच्या स्थानी ३३ कोटी देवांची कल्पना केली गेली, गोग्रास, गोस्पर्श याला महत्व दिले गेले, गोपालन करणारा गोपाल हा आमचा भगवान श्रीकृष्ण महाराज झाला. दही-दूध-लोणी चोरणारा सर्वात मोठा चोर (चौराग्रगण्यं) बनला आणि एकूणच समाजाने हे गाईचे महत्व ओळखले. पिढ्यानपिढ्या गाईला पूज्य मानणारा समाज इथे वास्तव्य करून आहे. त्यामुळे ह्या देशाच्या संस्कृती आणि परंपरेत गाईचे महत्व आणि स्थान वादातीत आहे. पण याचे महत्व घोड्याने शेती करणाऱ्या आणि उंटाचे दूध पिणाऱ्या समाजाला कळणे कठीणच आहे. असे असूनही शेवटी गाय-बैल भाकड झाल्यानंतर त्यांचा त्याग शेतकऱ्याला करावाच लागतो. अर्थात जर त्याला भाकड गाई-बैल यांच्यापासून आधुनिक मार्गाने पैसे कसे कमवावे हे माहित नसेल तर (काही ठिकाणी असे प्रयोग झाल्याचे वाचले आहे) अथवा त्याची भावनिक गुंतागुंत नसेल तर. अशा परिस्थितीत कोणी न्यायचे या पशूंना? किंवा हे प्राणी मेल्यानंतर काय करायचे? ढोर ओढणारा वेगळा समाज अस्तित्वात आला. गावकुसाबाहेर राहणारा, चामडे कमावणारा, पायताण शिवणारा असे समाजगट पिढ्यानपिढ्या हे काम करत राहिले. स्वतःला हिंदू समजत आले. इतरांनी त्यांना हिंदू म्हणून वागवले का? सन्मानाची वागणूक दिली का, मुख्य प्रवाहात, ग्राम उत्सवात सामील करून घेतले का, मंदिर प्रवेश मुक्तपणे दिला का, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिले का हे प्रश्न अगदीच अप्रासंगिक नाहीत पण लेखनसीमेस्तव आत्ता तूर्तास सोडून द्यायला हवेत.
गोमांस भक्षण - तेव्हा इथल्या समाजातील काही घटक गाईला – बैलाला मारून त्याचे मांस खातात. अन्य हिंदू समाजही गाय सोडल्यास अन्य प्राण्यांवर यथेच्छ ताव मारतो. रानडुक्कर, ससा, कासव, बकरा, कोंबडी, मासे, खेकडे, बदक, मांजर हे खाणार्यांची संख्या विपुल आहे. बृहदारण्यक उपनिषदात ‘ज्याला ख्यातनाम विद्वान, सभा गाजवणारा, ऐकत रहावेसे शब्द बोलणारा, सर्व वेद जाणणारा, आणि दीर्घायुष्य लाभलेला असा पुत्र हवा असेल त्याने आपल्या बायकोसोबत तूप घालून असा भात खावा ज्यात तरुण अथवा मोठ्या बैलाचे मांस शिजवून घातले आहे. अशाने ते (दाम्पत्य) अशाप्रकारच्या मुलाला जन्म देऊ शकतील.” हा ६.४.१८ चा स्वैरानुवाद आहे. स्वामी विवेकानंदांनीही मांसाहार करण्याचे समर्थन केले आहे. मग गायच का अपवाद ठरावी? हा प्रश्न अप्रस्तुत नाही. त्याचे उत्तर गाईला बहुसंख्य हिंदू समाज पूज्य मानतो आणि वर म्हटल्याप्रमाणे कृषिआधारित अर्थव्यवस्था असल्याने गोवंशरक्षण हवे. शिवाय वर उल्लेखलेल्या प्राण्याचे उपयोग असले तरी गाईएवढा सर्वार्थाने उपयोग कुठल्याही प्राण्याचा होत नाही. 
गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर - हिंदुस्थानातील हिंदुत्वाची कास धरणारे दोन महान नेते म्हणजे गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर! दोघांनीही गाईला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. पण दोघांनी विविध मार्गाने आणि वेगवेगळी कारणे देऊन गोरक्षणाचे महत्व अधोरेखित केले. गांधीजींचे थोडेसे धार्मिक, सांस्कृतिक, पूज्यभावना या अंगाने जाणारे तर स्वातंत्र्यवीरांचे वैज्ञानिक, practical, उपयुक्तता या अंगाने जाणारे. पण अंततोगत्वा गोवंश राहावा, त्याचे रक्षण व्हावे हीच दोघांची मनीषा! गांधीजी म्हणतात, THE COW is a poem of pity. One reads pity in the gentle animal. She is the mother to millions of Indian mankind. Protection of the cow means protection of the whole dumb creation of God. The ancient seer, whoever he was, began with the cow. The appeal of the lower order of creation is all the more forcible because it is speechless. (YI, 6-10-1921, p. 36)
My ambition is no less than to see the principle of cow protection established throughout the world. But that requires that I should set my own house thoroughly in order first. (YI, 29-1-1925, p. 38)
My religion teaches me that I should by personal conduct instill into the minds of those who might hold different views, the conviction that cow-killing is a sin and that, therefore, it ought to be abandoned.
(YI, 29-1-1925, p. 38)
या आणि अशा धर्तीवर गांधीजींनी अनेक ठिकाणी आपले गोवंशरक्षणाबद्दलचे विचार प्रकट केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गोरक्षणाचे दृष्टीनेही आजच्या वैज्ञानिक युगात पशूस देवता मानणारी ती खुळचट गोमहात्मे सांगून भागणार नाही. तसली भाबडी प्रवृत्ती राष्ट्रांत पसरविण्याचे सोडून जर आमचे गोरक्षक व्याख्याते ह्या कृषिप्रधान देशांत त्या उपयुक्त पशूचा आर्थिक उपयोग किती मोठा आहे, गायीची नि बैलाची वीण कशी वाढवावी, त्यांच्या मलमूत्रांची खते कशी करावी, गायीच्या दुधा-तुपाचे संवर्धनाचे प्रयोगहि उत्कृष्ट प्रकार कोणते, गुण कोणते, हे सर्व प्रयोगसिद्ध नि रासायनिक घटकांसह प्रत्यक्षनिष्ठ भाषेत सांगतील नि गोशाळाप्रभृति  संस्था गायीच्या आणि बैलाच्या जोपासनेचा मनुष्यास अधिकात अधिक प्रत्यक्ष उपयोग कसा होईल याच ऐहिक दृष्टीने चालवतील तरच आता गोरक्षणाचे महत्त्व लोकांस अधिक पटणारे आहे. त्यामुळे गोवंशरक्षण झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. गोपालन आणि गोरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वच गोपालन करणारे असतील आणि गोहत्या कोणी करणार नसेल तर गोरक्षणाचे प्रयोजन उरत नाही. पण कोणी गाय कापणार असेल, वासरे मारणार असेल तर मग गोरक्षणासाठी काहीजण आक्रमक होऊ शकतात. शिवचरित्रात बाल शिवाजीचा एक प्रसंग वाचायला मिळतो. कसाई गायीला ओढत-फरफटत नेत होता. बाल शिवाजीने त्याला थांबवून गाईला सोडून देण्याची विनंती केली. साहजिकच कसायाने नकार देत आपले काम चालूच ठेवले. त्यावर डोळ्यात खदिरांगार फुललेल्या त्या तेजस्वी बाल शिवाजीने पूर्वकल्पना देत त्या कसायाचा हात बुंध्यापासून उडवला. तेव्हा संस्कृतीच्या मानबिंदूंची, प्रतिकांची विटंबना, हत्या होताना लोक आक्रमक होण्याची शक्यता टाळता येत नाही. पण त्यावेळची परिस्थिती, राज्यव्यवस्था, कायदेपद्धती, संविधानाचे राज्य याचाही विचार व्हायला हवा. अथवा एकाने केलेली हत्या योग्य आणि दुसऱ्याने केलेली चूक असे म्हणता येणार नाही. मुळात भारतीय संविधानात गोहत्या रोखण्याच्या दृष्टीने कायदेमंडळाने प्रयत्न करावेत असे मार्गदर्शक तत्व आहे. तेव्हा घटनेचा आधार गोवंश हत्याबंदीला आहे. आता बऱ्याच राज्यांनी गोवंशहत्याबंदीचे कायदे लागू केले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन मारहाण करणे, शेण खायला लावणे असले प्रकार होताच कामा नयेत.
वर्तमान घटना - चरखी-दादरी या उत्तर प्रदेशातील ठिकाणी गैरमुस्लिम जमावाने अखलाक नावाच्या एका मुस्लीम माणसाला मारले. कारण दिले गेले की त्याच्याकडे गोमांस होते. त्याच्या परसदारी वासराचे पाय सापडले इत्यादि. पुढे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (forensic lab) कदाचित हे सिद्धही झाले असेल की त्याचेकडे गोमांस होते. पण म्हणून जमावाने त्याच्या केलेल्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. दिल्लीत डॉ. नारंग नावाच्या एका उमद्या हिंदू तरुण दंतवैद्यकाची हत्या बिगरहिंदू जमावाने केली. त्यावर मोठे रान उठले नाही ते कदाचित डॉ. नारंग हिंदू असल्याने असेल आणि या प्रकरणात गायीचा काही संबंध नव्हता. पुन्हा एक दृश्य झळकले की काही दलित तरुणांना एका गाडीला दोरीने बांधून त्यांना लोखंडी सळयांनी काही तरुणांनी मारले. (http://abpmajha.abplive.in/india/gujrat-una-dalit-protest-in-loksabha-rajyasabha-255341) आरोप हाच की ते गोवंशाची तस्करी करत होते. महाराष्ट्रातही पुण्याजवळ नसरापूर येथे मारहाण झाली ( http://abpmajha.abplive.in/pune/pune-bogus-gorakshak-allegedly-beaten-up-trader-of-nasrapur-265767 ), काही ठिकाणी अशाप्रकारे गायींची वाहतूक करणाऱ्यांना जबरदस्ती शेण खायला लावण्यात आले. मला व्यक्तिशः गोसेवेसाठी झटणाऱ्या, केसेस दाखल करणाऱ्या एका वकिलाचा पुढीलप्रमाणे मेसेज आला - India Today: Karnataka Chief Minister Siddaramaiah's son Rakesh passes away in Belgium. http://google.com/newsstand/s/CBIwgfbc0yw
Siddharamaiah as soon as becoming CM of Karnataka started Cow slaughtering in the state which was stopped by the then BJP govt. when they were in power.
Baap ke Paap ne Bete ko nigal liya.
Om shanti shanti shanti.
Let's see who is the next target in his family.
आणि एकुणातच देशभर असे गोरक्षक जोमाने कामाला लागल्याचे दिसले. आरोप-प्रत्यारोप होत राहिले. अशांनी नाहक बळी जातातच पण त्याचे चित्रीकरण पुढील दहशतवादी तयार व्हायला उपयुक्त ठरते. त्यामुळे  अशा तऱ्हेचे सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्न चालू असताना कडक शासन, अशा गडबड करणाऱ्या तत्वांना समज देण्याचे काम कोणीच करताना दिसून येईना. गुजरातच्या उना येथील तरुणांना गाडीला बांधून मारतानाचा व्हिडिओ पाहून मीही व्यथित झालो. फेसबुकवर त्यादिवशी १ ऑगस्ट ला माझा विचार प्रकट केला.   
आणि या सर्व विचित्र पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना या संदर्भात एक प्रश्न विचारला गेला आणि ते बरसले. (http://indianexpress.com/article/india/india-news-india/pm-narendra-modi-says-he-gets-angry-at-those-running-shops-in-name-of-cow-protection-2958092/) ८०% गोरक्षक बोगस असल्याचे म्हणाले. ७ ऑगस्ट ला हे वृत्त आले. ह्यामुळे काही नमोभक्तही नाराज झाले. ते म्हणू लागले की आम्हाला आता आरोपी असल्यासारखे वाटते आणि मुळात मोदींनी ही ८०% टक्केवारी आणली कुठून? आता मुळात जेव्हा नरेंद्र मोदींसारखा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि पंतप्रधान काही विधान करतो तेव्हा त्याला काही आधार तर असेल. आपल्याला जी माहिती कळते, दिसते, दाखवली जाते त्यापेक्षा अधिक माहिती त्यांना निश्चितच प्राप्त होत असली पाहिजे आणि तीही अखिल भारतीय स्तरावर. आणि मुळात आपण आपल्याला ८०% का समजावे आपण त्या २० टक्क्यातले आहोत असे समजावे; नव्हे तसा विश्वास हवा. कर नाही त्याला डर कशाला. आता राहता राहिला मुद्दा ८०% च का? तर त्याचा अर्थ बहुतांश असा असावा. कारण मोदी म्हणाले ८०% गोरक्षक हे गोरक्षणाच्या नावाखाली अवैध धंदे करत आहेत याचा अर्थ देशात एक लाख अमुक हजार अमुकशे अमुक गोरक्षक आहेत आणि त्यातील ऐंशी हजार तमुकशे तमुक लोक अवैध धंदे करतात असा होत नाही. 'त्या शाळेतील ५०% शिक्षक चांगले आहेत, ५०%हून अधिक वकील नाडतात, ७०% डॉक्टरांचे केमिस्टशी साटंलोटं असतं' या आणि अशा विधानांमागे खरोखरीची टक्केवारी, प्रमाण नसते. त्यामुळे ८०% म्हणजे बव्हंशी, मोठ्या प्रमाणावर. आणि शिवाय उघड झालेल्या घटनांवरून ते दिसतच होते. त्यामुळे कुणाही गोभक्ताने व्यथित होण्याचे काहीच कारण नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका गोरक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यापासूनच आग्रही राहिला आहे. द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात गोहत्या बंदीसाठी देशभर स्वाक्षरी संग्रह करण्यात आला आणि तत्कालीन राष्ट्रपतींना तो देशाची मागणी म्हणून देण्यात आला. हा सनदशीर प्रयत्न होता. अन्यथा त्याचवेळी हिंसेचे समर्थन करून जबरदस्तीने गोहत्या थांबवण्याचा प्रयत्न संघाने केला असता. पण लोकशाही मूल्यांवर अढळ निष्ठा असणाऱ्या संघाने स्वाक्षरी संग्रह केला. सामाजिक सौहार्द नाही बिघडवला. म्हणून वर्तमान घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वक्तव्यानंतर संघानेही आपले अधिकृत विधान माननीय सरकार्यवाहांचे वक्तव्य म्हणून ७ ऑगस्ट ला प्रसिद्ध केले.
त्यामुळे आता संदेश स्पष्ट आहे. हिंदुत्व चळवळीला बदनाम करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तत्वांवर राज्य सरकारांनी कठोरतेने कारवाई करायला हवी.

8 comments:

  1. आपल्याला असं म्हणायचं आहे का की गाय ही शेतीसाठी उपयुक्त होती म्हणून हिंदूंना पूज्य होती आणि आणि हिंदूंना पूज्य आहे म्हणून गायीची हत्या व्हायला नको? तसं असेल तर गायीची शेतीसाठीची उपयुक्तता संपली की तिची हत्या करण्याचीही मोकळीक असायला हवी. आपण सर्वज्ञानी हिंदुत्ववादी भासत असल्याने आपला सकल ज्ञानशाखांचा व्यासंग असेलच, पण आजच्या घडीला शेतीच्या कामांत गायीची उपयुक्तता किती राहिली आहे ह्यावर काही संदर्भासहित प्रकाश आपण पाडू शकाल काय? दुसरा मुद्दा म्हणजे हिंदू समाज ज्याला ज्याला पूज्य मानतो ते उपयुक्ततेमुळेच का? म्हणजे हिंदू समाजाने युटिलिटी आधारित पूज्यता मानली आहे का? मग वडाच्या झाडाची, आंब्याच्या पानाची उपयुक्तता काय आहे? आणि ह्यांची जी उपयुक्तता आहे ती बाकी झाडांत नाहीच का? पेनिसिलीन सुद्धा हिंदू समाजाला फार उपयोगी पडते. मग ते पूज्य आहे का? आणि जे उपयुक्त ते पूज्य असं असेल तर सर्व चराचरात देवत्व आहे ह्याला बाधा येत नाही का? गणपतीच्या शाडूच्या मूर्तीचा 'उपयोग' काय? साप उंदीर खातात, उंदीर धान्याचे नुकसान करतात, मग कृषिप्रधान संस्कृतीत साप हा गायीपेक्षा कमी किंवा जास्त पूज्य कसा ठरतो? आणि म्हैस कितपत पूज्य आहे? हिंदू संस्कृतीत म्हशीशी निगडीत कोणते सण आहेत? आपण ह्या उद्धटपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्याल का? आपल्याला असं वाटत नाही का की हिंदूना नको म्हणून गाय मारायची नाही हे अधिक ताकदवान स्पष्टीकरण आहे आणि तुम्ही केलात तो शालेय निबंधी भाबडेपणा आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. वा। माझा लेख आपल्याला विचार प्रवृत्त करता झाला हे पाहून बरे वाटले..

      Delete
  2. काळा सरदार महोदय, खरं तर तुम्ही मांडलेलं तर्कट हेच शालेय निबंधी भाबडेपणा आहे. विरोध करण्यासाठी अभ्यास तरी करा आधी....

    ReplyDelete
    Replies
    1. बरं भाबडे आम्ही अजय महोदय. पण तुम्ही तर अभ्यासू आहात ना? मग एकतर माझे प्रश्न चुकीचे कसे हे दाखवा किंवा तुम्हाला त्यांची उत्तरे देता येत नाहीत असं म्हणण्याचं धाडस तरी.

      Delete
  3. उगीचच विरोध करणेपेक्षा आपण धर्मासाठी काय केले आहे ते पहावे.अथवा स्वता कोरडे पाषाण जगा संगे ब्रहमध्यान असे होते

    ReplyDelete
  4. उगीचच विरोध करणेपेक्षा आपण धर्मासाठी काय केले आहे ते पहावे.अथवा स्वता कोरडे पाषाण जगा संगे ब्रहमध्यान असे होते

    ReplyDelete
  5. अभिनंदन ! लेख सविस्तर व प्रसंगोचित आहे.
    टोपण नावाने लिहिणाऱ्यास उत्तर अपेक्षित नसते !
    माझ्या माहितीनुसार, गायी प्रमाणेच, विशेषेकरून लडाख व तिबेट सारख्या प्रदेशात 'याक' ह्या प्राण्यालाही अनन्यसाधारण - कदाचित गायीप्रमाणेच - महत्व आहे. त्याच्या दुधापासून ते केसांचे कांबळे विणण्यापर्यंत सर्व उपयोग केले जातात. त्याच्या मांसाला विशेष महत्व आहे. ते वाळवून त्याचे छोटे तुकडे (क्युब्स) चघळतात, जे ताकद येण्यासाठी उपयुक्त मानले जातात. पण तरीही 'याक' ला पवित्र मानले जाते. एव्हरेस्ट परिसर हा पवित्र मनाला जातो. तिथे याक च्या हत्येला बंदी आहे.
    गायीचे जे महत्व पौराणिक काळापासून आपल्या देशात आहे, त्याला आता आर्थिक कारणापलीकडे 'श्रद्धास्थान' असे निधान आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. माझे टोपणनाव आहे हा माझा जघन्य अपराधच, माझे मुद्दे चूक का बरोबर हे तर क्षुल्लकच आहे. पण मी कितीही दुर्लक्ष करण्याजोगा असलो तरी मी मुळात हेच म्हणत होतो कि गायीच्या रक्षणाचा आणि लोकशाहीचा काही संबंध नाही. गाय ज्यांची माता आहे त्यांनी कसेही करून मातेचे रक्षण केले तर ते चूक आहे का? मातेवरील श्रद्धा महत्वाची का लोकशाही? पण जाऊ दे, मला नाव नाही ना, मग तुम्ही नकाच लक्ष देऊ माझ्याकडे.

      Delete