"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, March 27, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक ३

स्वामीजींनी पश्चिमी विचारजगताला तर हलवून सोडलेच परंतु भारताचीही अखंड परिक्रमा करून त्यांनी ठिकठिकाणी जी भाषणे दिली ती आपल्याला आजही मार्गदर्शक आहेत.

स्वामीजींच्या काळातला भारत म्हणजे अखंड भारत. ज्यात आत्ताचा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादींचाही समावेश होता. या भागातसुद्धा हिंदू वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. स्वामीजींनी लाहोरमध्ये केलेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण भाषणाचा आज आपण या लेखात विचार करणार आहोत. स्वामीजींची सभा तेथील आर्य समाज व सनातन धर्म सभा यांनी आयोजित केली होती. त्यात स्वामीजींनी “The common bases of Hinduism” या विषयावर भाषण केले.

आजच्या भारतवासीयांसाठी तर या भाषणातून राष्ट्रीय एकत्मतेसाठीचे आवश्यक पैलू स्वामीजींनी प्रकट करून दाखवले आहेत. ज्या भागात स्वामीजी बोलत होते तेथे पंजाबी-शीख संप्रदायाचे प्रमाण खूप अधिक असल्याने त्यांनी आपल्या भाषणात गुरु नानकांचे उदाहरण देऊन सुरुवात केली आणि मग गुरु गोविंद सिंहांचे उदाहरण दिले. गुरु नानक यांनी ज्याप्रमाणे आपले बाहू पसरून सर्वांना प्रेमाचे आवाहन केले आणि केवळ हिंदू अथवा मुसलमानच नव्हे, तर अख्ख्या जगाला कवेत घेण्याची क्षमता दर्शविली त्याप्रमाणे आपण आपली अंतःकरणे प्रेमाने ओतःप्रोत भरण्याची आवश्यकता आहे. या प्रेमाचा दाखला देऊन पुढे स्वामीजी गुरु गोविंद सिंहांच्या वीरत्वाचा गौरवपूर्वक उल्लेख करतात. आपल्याच लोकांसाठी लढून, रक्त सांडून जेव्हा त्याच लोकांनी त्यांची साथ सोडली तेव्हाही न चिडता, न रागावता गुरु गोविंद सिंह एखाद्या शरविद्ध घायाळ सिंहाप्रमाणे दक्षिण भारतात निघून गेले. परकीयांशी ते झुंजले; पण स्वकीयांशी त्यांनी वैर नाही मांडले. शक्तीबरोबरच असे प्रेम आपण आपल्या मनात जागृत ठेवायला हवे.
आपण हिंदू अनेक पंथ-उपपंथ, संप्रदाय, वैचारिक गट यात विभागले गेलो आहोत. मुक्त विचार करायचा म्हणजे अशा विविध पंथांचा उदय होणं हे साहजिकच आहे. पण त्यातूनही आपल्याला एकात्मता साध्य करावीच लागेल. आणि ती करण्यासाठी आपल्याला सर्वांना आपली हृदये विशाल करावी लागतील. राष्ट्राच्या एकतेचे उदात्त ध्येय समोर ठेवून वरवर दिसणारे भेद बाजूला सारून मूलगामी एकत्वाचा वेध घ्यावा लागेल. भांडणे पुरे झाली. संघर्ष खूप झाले. आता प्रेमाने जिंकावयास हवे.

आपण सारे ‘हिंदू’ आहोत. ‘हिंदू’ हा शब्द वापरल्यावर स्वामीजी म्हणतात की ‘हिंदू’ या शब्दाला आज कोणताही अर्थ प्राप्त झाला असूद्या, (लक्षात हे घ्यावयास हवे की त्यावेळची परिस्थिती खचितच अभिमानाने आणि निर्भयपणे हिंदू असण्याचा उच्चार करण्याची नव्हती) पण मी मात्र ‘हिंदू’ या शब्दाचा उल्लेख गौरवपूर्वकच करतो आहे. आपण आपल्या कर्तृत्वाने जगाला हे दाखवून देऊ की जे अध्यात्मिक आहे, गौरवपूर्ण आहे ते म्हणजेच हिंदू! आणि जगातल्या कोणत्याही भाषेतील सर्वोच्च, पवित्रतम असा शब्द म्हणजे हिंदू. आपल्या पूर्वजांचा अभिमान आपण बाळगायला हवा. जेवढा आपल्या भूतकाळाचा अभ्यास आपण करू तेवढा हा अभिमान अधिकाधिक वाढतच जाईल. तेव्हा आपल्या रक्तात हा अभिमान भरून घ्या आणि जगदुद्धारासाठी तयार व्हा. तुम्ही तेव्हाच स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ शकता जेव्हा ‘हिंदू’ या शब्दाच्या केवळ उच्चारणानेही तुमच्या शरीरातून विजेची लहर सळसळून जात असेल.

पुढे स्वामीजी ‘आपले राष्ट्र’ या बिंदूचे विश्लेषण करतात. ज्याप्रमाणे व्यक्तीला कर्माचा सिद्धांत लागू होतो त्याप्रमाणे अगदी राष्ट्रांच्या बाबतीतही तो लागू होतो. प्रत्येक राष्ट्राला ठराविक कार्य करायचे आहे. आपली स्पष्ट भूमिका बजावायची आहे. लहानपणी आपण कथा ऐकल्या असतील की, सातासमुद्रापार एक पक्षी असतो आणि एखाद्या व्यक्तीचा प्राण त्याच्यात असतो. तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला कितीही मारा, काहीही करा..त्या पक्ष्याचा प्राण आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला काही होत नाही. तसेच प्रत्येक राष्ट्राचा ठराविक एका गोष्टीत प्राण असतो. ती गोष्ट असेपर्यंत ते राष्ट्र अस्तित्वात राहते. टोळधाडीसारखी आक्रमणे आणि नृशंस संघर्ष होऊनही इथली जमात टिकाव धरून राहिली. आणि केवळ विजयाने उभीच राहिली नाही तर आक्रमणांचा करायला सज्ज झाली. कारण इथल्या पूर्वजांनी आपल्याला असा विचार दिला जो केवळ विज्ञानाच्या प्रगतीने साध्य होणार नाही. वेद आणि उपनिषद यातून असे विचार आपल्यात रुजवले गेले की जे आज पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत राहिले आहेत आणि आपल्या धमन्यांमधील रक्ताच्या बिंदू-बिंदूमधून वाहत आहेत. हा हिंदुत्वाचा विचार आपण जोपर्यंत आपल्यात टिकवून ठेऊ आणि पुढे संक्रमित करू तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपण भक्त प्रल्हादासारखे तावूनसुलाखून बाहेर पडू. 

आपल्या देशात अनेक संप्रदाय निर्माण झाले आहेत आणि होतही राहणार आहेत परंतु सांप्रदायिक झगडे व्हायला नकोत. संप्रदाय असावेत पण सांप्रदायिकता नसावी. म्हणून आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति’ म्हणजे सत्य एकच आहे पण विद्वान त्याला विविध नावांनी संबोधतात. तेव्हा हा विचार शैव, वैष्णव, गाणपत्य, बौद्ध, जैन, शीख अशा सर्वांनीच मनाशी धरून एकात्मतेचा पुनरुच्चार केला पाहिजे.

पुढे स्वामीजींनी ईश्वर संकल्पना, इथल्या हिंदूचे ईश्वराबद्दलचे सर्वसाधारण मत, उपनिषदातील आत्मन् हा विचार, आत्म्याचे अमरत्व या आणि अशा गोष्टींवर सुंदर विवेचन केले आहे. हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्याचे मनन-चिंतन करण्यासारखा आहे. 

3 comments: